मुंबई – भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने येथील बांद्रा-कुर्ला संकुलात इनडोअर नेटमध्ये कसून सराव सुरू केला आहे. गेल्या तब्बल तीन वर्षांत कोहलीच्या बॅटमधून मोठी खेळी झालेली नाही, त्यामुळे त्याच्या संघातील स्थानाबाबत टीकाही होत आहे. त्यामुळेच कोहलीही सध्या सरावात कठोर मेहनत घेत आहे.
कोहली वरळीत असल्यामुळे त्याला या अकादमीत जाणे-येणे सोपे ठरत आहे. तसेच तो घरातच तयार केलेल्या खास जिममध्येही तंदुरुस्तीसाठी घाम गाळत आहे. आशिया करंडक टी-20 स्पर्धा येत्या 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे. ही स्पर्धा 11 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
या स्पर्धेतील सलामीचा सामना अफगाणिस्तान व बांगलादेशमध्ये होत असून, 28 ऑगस्टला भारतीय संघाचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. विश्रांतीनंतर कोहली पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
आशिया करंडक स्पर्धेत कोहलीची कामगिरी आजवर सरस झालेली आहे. त्यातच पाकिस्तानविरुद्ध त्याची बॅट कायमच चालली असल्यामुळे चाहत्यांनाही तो या स्पर्धेत शतकाचा दुष्काळ संपवेल असा विश्वासही आहे.