दुबई – नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली व लोकेश राहुल हे प्रमुख फलंदाज आशिया करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात परतले असले तरीही त्यांच्या सुमार कामगिरीचीच चिंता निर्माण झाली आहे. या स्पर्धेला येत्या शनिवारपासून प्रारंभ होत असून दुसऱ्याच दिवशी रविवारी भारताचा सलामीचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होत आहे. या सामन्यासाठी भारताने भक्कम संघ जाहीर केला असला तरीही त्यातील प्रमुख फलंदाजांनाच गेल्या काही काळापासून सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत आहे.
कर्णधार रोहितसह कोहली व राहुल यांना आपल्या दर्जाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. कोहलीने तर गेले तीन वर्षे एकही शतकी खेळी केलेली नाही. राहुलही दुखापतीतून पूर्ण बरा झाल्यावर झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेत संघात परतला होता. मात्र, त्यालाही धावा करता आल्या नाहीत. दुबळ्या संघासमोर ही कामगिरी असेल तर पाकिस्तान विरुद्ध काय होणार याचीच चिंता आता संघ व्यवस्थापनाला लागली आहे.
भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.
गेल्या वर्षी झालेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाला या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तान विरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे त्या पराभवाचा वचपा काढण्याची भारतीय संघाला सुवर्णसंधी आहे. मात्र, फलंदाजांच्या कामगिरीवर चिंतेचे वातावरण असल्याने या सामन्यात मधल्या फळीला तसेच संघातील सातत्यपूर्ण कामगिरी करत असलेल्या नवोदित खेळाडूंवरच भारताची मदार राहणार आहे.