मुंबई – रवीचंद्रन अश्विन याने निवृत्त बाद होण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता, असे मत राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक कुमार संगकारा यांनी व्यक्त केले आहे. राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यात नवोदित व भरात असलेल्या रियान परागला फलंदाजीची संधी मिळावी यासाठी अश्विनने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. नव्या नियमानुसार अश्विन निवृत्त बाद घोषित केला गेला व अशी नोंद झालेला तो पहिलाच फलंदाज ठरला. त्याच्या या कृतीवर सध्या संमिश्र मते व्यक्त होत असतानाच संगकारा यांनी त्याची पाठराखण केली आहे.
याआधी अश्विनच्या निर्णयाचे वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज क्रिकेटपटू इयान बिशप यांनी देखील समर्थन केले होते. याबाबत त्यांनी ट्विट करताना म्हटले होते की, “ही एक उत्तम टी-20 रणनीती आहे. 21 व्या शतकात टी-20 फॉरमॅट आपल्याला सांगत आहे की आपण कसा विचार करू शकतो आणि खेळ कसा बदलू शकतो.”
रिटायर्ड आऊट (निवृत्त)म्हणजे काय?
दरम्यान, आयपीएलच्या 15 व्या सीझनच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूला निवृत्त (रिटायर्ड आऊट) केले गेले. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध आयपीएल 2022 च्या 20 व्या सामन्यात, राजस्थान रॉयल्सच्या रविचंद्रन अश्विनने निवृत्तीचा (Retired out) निर्णय घेतला. रविवारी राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यादरम्यान हा प्रकार घडला. अश्विन 23 चेंडूत 28 धावांवर खेळत होता. त्यानंतर त्याने अचानक मैदान सोडले आणि रियान परागला मैदानावर येण्याची संधी दिली होती.