मुंबई : आयपीएलच्या 15 व्या सीझनच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूला निवृत्त (रिटायर्ड आऊट) केले गेले. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध आयपीएल 2022 च्या 20 व्या सामन्यात, राजस्थान रॉयल्सच्या रविचंद्रन अश्विनने निवृत्तीचा (Retired out) निर्णय घेतला. रविवारी राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यादरम्यान हा प्रकार घडला. अश्विन 23 चेंडूत 28 धावांवर खेळत होता. त्यानंतर त्याने अचानक मैदान सोडले आणि रियान परागला मैदानावर येण्याची संधी दिली.
लीगमध्ये पहिल्यांदाच असे घडले. अश्विनच्या या निर्णयानंतर ‘रिटायर्ड आऊट’ हा शब्द सोशल मीडियावरही ट्रेंड होऊ लागला आहे.
यानंतर वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज क्रिकेटपटू इयान बिशपने ट्विट केले की, “ही एक उत्तम टी-20 रणनीती आहे. 21 व्या शतकात टी-20 फॉरमॅट आपल्याला सांगत आहे की आपण कसा विचार करू शकतो आणि खेळ कसा बदलू शकतो.”
रिटायर्ड आऊट (निवृत्त)म्हणजे काय?
(1) जेव्हा एखादा फलंदाज अंपायर(पंच) आणि विरोधी संघाच्या कर्णधाराला न कळवता आणि त्यांच्या संमतीशिवाय पॅव्हेलियनमध्ये परततो तेव्हा त्याला निवृत्त मानले जाते. ICC च्या नियम 25.4 मध्ये फलंदाजाने निवृत्ती घेण्याचे नियम दिले आहेत.
(2) नियम 25.4.1 नुसार, चेंडू टाकला नाही तर फलंदाज कधीही निवृत्त होऊ शकतो. खेळ सुरू होण्यापूर्वी अंपायरला फलंदाजाच्या माघारीचे कारण स्पष्ट करावे लागते. त्यानंतरच पुढचा चेंडू टाकला जातो.
(3) नियम 25.4.2 नुसार, जर फलंदाज आजारपणामुळे, दुखापतीमुळे आणि इतर कोणत्याही गंभीर परिस्थितीमुळे खेळण्यास असमर्थ असेल ज्याला टाळता येत नाही आणि पॅव्हेलियनमध्ये परतला असेल, अशा स्थितीत फलंदाज निवृत्त नॉट आउट असल्याचे म्हटले जाते.
(4) नियम 25.4.3 नुसार, 25.4.2 मध्ये सांगितल्या व्यतिरिक्त कोणत्याही कारणास्तव फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतला तर, त्या प्रकरणात केवळ विरोधी संघाच्या कर्णधाराच्या परवानगीने, तो फलंदाज फलंदाजीसाठी क्रीजवर परत येऊ शकतो. जर विरोधी संघाच्या कर्णधाराने परवानगी दिली नाही आणि त्याची फलंदाजी चालू ठेवली नाही तर तो फलंदाज निवृत्त मानला जातो.
(5) रिटायर्ड आऊट आणि रिटायर्ड हर्ट यात मोठा फरक आहे. रिटायर्ड आउट झाल्यावर, फलंदाज परत येऊ शकत नाही, तर रिटायर्ड हर्ट झाल्यावर फलंदाज नंतर फलंदाजीसाठी मैदानात परत येऊ शकतो.
आता जाणून घ्या अश्विन का निवृत्त (‘रिटायर्ड आऊट’) झाला…
(1) राजस्थानने 67 धावांत चार विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर जोस बटलर, संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल आणि रुसी व्हॅन डर डुसेन पॅव्हेलियनमध्ये परतले होते. यानंतर राजस्थानच्या संघ व्यवस्थापनाने रविचंद्रन अश्विनला रियान परागच्या वर फलंदाजीसाठी पाठवले. राजस्थानचा हा निर्णय योग्य ठरला. शिमरॉन हेटमायरसह अश्विनने चांगली फलंदाजी करत विकेटची आणखी पडझड होण्यापासून रोखले.
(2) नंतर अश्विनला वाटले की रियान पराग अजून फलंदाजीसाठी यायचा बाकी आहे आणि तो त्याच्यापेक्षा चांगली फटकेबाजी करू शकतो, म्हणून त्याने निवृत्ती (‘रिटायर्ड आऊट’) घेण्याचा निर्णय घेतला. अश्विनने हेटमायरसोबत 68 धावांची भागीदारी केली. अश्विन अंपायर(पंच) आणि लखनौचा कर्णधार केएल राहुल यांना न सांगता पॅव्हेलियनमध्ये परतला तेव्हा राजस्थानची धावसंख्या135(18.2 षटक) अशी होती.
(3) अश्विन 23 चेंडूत 28 धावा करून निवृत्त (‘रिटायर्ड आऊट’) झाला. या खेळीत त्याने दोन षटकार मारले. यानंतर रियान पराग मैदानात आला. परागसह शिमरॉन हेटमायरने राजस्थानला 165 धावांपर्यंत पोहोचवले. हेटमायरने 36 चेंडूत एक चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 59 धावांची नाबाद खेळी खेळली तर रियान परागने 4 चेंडूत 8 धावा केल्या.
शिमरोन हेटमायरला याबाबत विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला, मला याबाबत काहीच माहिती नव्हती. तो थेट क्रीझ सोडून डगआऊटजवळ गेला तेव्हा मला कळलं. पण त्याने जो निर्णय घेतला तो चांगला होता. कारण आर अश्विन खूप थकल्यासारखा वाटत होता असंही शिमरोन म्हणाला.
नियमांचा फायदा घेण्यात अश्विन माहिर…
क्रिकेटच्या नियमांचा फायदा घेण्याच्या बाबतीत अश्विन हा सुपरस्टार आहे. 2019 च्या आयपीएलमध्ये त्याने ‘मंकड’ या नियमाचा उत्तम वापर केला. तेव्हा यावरून खूप वाद झाले होते. अश्विनच्या या निर्णयावर क्रिकेट जगत दुभंगले होते. अनेक खेळाडू अश्विनच्या बाजूने तर अनेक खेळाडू अश्विनला खिलाडूवृत्तीनुसार विरोध करत होते. आता त्याच्या निवृत्तीच्या निर्णयावर क्रीडा जगताची काय प्रतिक्रिया येतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.