नगर -करोना विषाणूची लागण विद्यार्थ्यापर्यंत पोहचू नये, यासाठी महाराष्ट्रातील सर्व आश्रमशाळा महाराष्ट्र करोनामुक्त होईपर्यंत बंदच ठेवाव्यात, अशी मागणी शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी केली आहे. राज्याचे आदिवासी मंत्र्यांना या संदर्भात मेलवरुन निवेदन पाठविण्यात आले आहे.
सध्याच्या भीषण परिस्थितीत आश्रमशाळा सुरू ठेवणे हे अत्यंत जोखमीचे ठरू शकते. आश्रमशाळेतील विद्यार्थी एकाच गावचे नसून वेगवेगळ्या गावचे, तालुक्याचे असतात. तसेच त्यांच्या राहण्याची, झोपण्याची, जेवणाची, स्नान करण्यासाठी सामूहिक सुविधा पुरवलेली असते. त्यामुळे “फिजिकल डिस्टन्स’चे पालन तेथे होऊ शकत नाही.त्यामुळे संसर्गाचा धोका जास्त प्रमाणात बळावू शकतो, असे शिक्षक भारतीचे आमदार कपील पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, राज्य सचिव सुनील गाडगे, नगर जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप आश्रम शाळा प्रतिनिधी मंजूषा शेडगे यांनी सरकराच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.
विद्यार्थी शाळेत असल्यामुळे पालकांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे संपूर्ण राज्य करोनामुक्त होत नाही, तोपर्यंत आश्रमशाळा बंद ठेवाव्यात, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. शिक्षक भारतीचे पदाधिकारी सचिव विजय कराळे, बाबासाहेब लोंढे, जितेंद्र आरु, महेश पाडेकर, डॉ. किशोर डोंगरे, संभाजी पवार, संजय तमनर, संपत वाळुंज, नवनाथ घोरपडे, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, रोहिदास चव्हाण, किसन सोनवणे आदींनी ही भूमिका मांडली आहे.