मुक्ताईनगर – आदिशक्ती संत मुक्ताबाईंच्या पालखीने आज (दि. 3 जून) मुक्ताईनगर येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. मुक्ताबाई मुक्ताबाई ! आदिशक्ती मुक्ताबाई !! जयघोषात दुपारी 12 वाजता विधिवत पादूका पूजा होऊन पालखीने प्रस्थान ठेवले.
गेली दोन वर्षे करोनामुळे थांबलेली पायी वारी पुन्हा सुरु झाल्याने प्रस्थान सोहळ्यासाठी उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह मध्यप्रदेश राज्यातून हजारो भाविक मोठ्या संख्येने श्री क्षेत्र कोथळी येथे दाखल झाले होते. मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रविंद्र पाटील यांनी पादूकांना मंगल अभिषेक व आरती केली. वारकरी भाविक भजन गात पावली खेळत तल्लीन झाले होते. मंदिर परिसरात केळीचे खांब, आंब्याची तोरणे लावल्याने मंगलमय वातावरण तयार झाले होते.
11 वाजता नैवेद्य देवून महाआरती करण्यात आली. मुक्ताबाई मुक्ताबाई जयघोषात पादूका पालखीत ठेवून सोहळा मंदिर परिक्रमा करुन पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, खासदार रक्षा खडसे, रोहिणी खडसे, मध्यप्रदेश खंडवाचे खासदार ज्ञानेश्वर महाजन, सोहळा प्रमुख रविंद्र महाराज हरणे, व्यवस्थापक विनायकराव हरणे पाटील, उध्दव महाराज जुनारे, पंकज महाराज पाटील, नितीन महाराज, विशाल महाराज, विजय महाराज, रतिराम महाराज, वाल्मिक महाराज, अंबादास महाराज, पुजारी व्यवहारे आदी उपस्थित होते.
मुक्ताईनगर शहरात जल्लोषात स्वागत –
मुक्ताईनगर शहरात पालखी सोहळ्याचे आगमन होताच ठिकठिकाणी फटाके उडवून सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. सोहळा नविन मुक्ताबाई मंदिरात दुपारी विसावा घेवून सातोड गावात येताच जल्लोषात स्वागत झाले. या पालखी सोहळ्याचा प्रवास 700 किलोमीटरचा असून 33 दिवसांचा प्रवास करुन हा सोहळा श्री क्षेत्र पंढरपूर मुक्कामी पोहोचेल.