आळंदी -महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव पाहता संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळा व जगद्गुरु संत तुकाराम महाराज पायीवारी पालखी सोहळा व इतर पालखी सोहळे रद्द करण्याचा शासनाने घेतलेल्या निर्णयाला दिंडी प्रमुख, वारकरी, फडकरी व इतर घटकांनी विरोध दर्शवला आहे. एकंदरीतच पालखी सोहळ्यावरून शासन, देवस्थान व दिंडी प्रमुख, वारकरी यांच्यात मतमतांतरे असल्याचे दिसून येत असून माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या दोन दिवसांवर (दि. 13) येऊन ठेपला असताना पायी वारी काढण्यावरून तिढा निर्माण झाला आहे.
आळंदीत सोमवारी (दि. 9) या अनुषंगाने बैठक पार पडली असून या बैठकीत वारीची परंपरा खंडित होऊ नये यासाठी पायी वारी होण्याबाबत अनुकूल चर्चा झाल्याचे समजत. या बैठकीत चर्चा झाल्यानुसार वारकरी युवक संघाचे इंदापूर तालुकाध्यक्ष संतोष महाराज काळे यांनी देवस्थानला निवदेन देत वारी रद्दला विरोध दर्शविला आहे. या बैठकीतला निर्णय देखील लेखी स्वरूपात त्यांनी देवस्थानला कळवला आहे.
या बैठकीत माउलींचे चोपदार राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, गाथा मंदिर, देहूचे पांडुरंग घुले, आत्माराम शास्त्री, पंडित क्षीरसागर, सुनील बोराडे, सौरभ शिंदे आदी महाराज, वारकरी मंडळी उपस्थित होते. तर अनेकांनी फोनवरून निर्णयाला अनुमोदन दिल्याचे काळे यांनी सांगितले.
वारी रद्दचा निर्णय मान्य नाही. माउलींच्या पादुका डोक्यावर घेऊन किमान 50 ते 100 वारकऱ्यांना पायी वारी करण्याची परवानगी दिली जावी किंवा पादुका हॅलिकॉप्टर, वाहनाने न्याव्यात व वारकऱ्यांना पायी जाण्यास परवानगी दिली जावी, असे म्हंटले आहे.
पालखी सोहळ्याबाबत काय निर्णय घेतला जावा यासाठी देवस्थानने माउलींच्या सोहळ्याशी संबंधित घटकाच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या होत्या त्यात अनेकांनी परंपरा जपली जावी, शासन जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचे म्हंटले होते. त्यानुसारच देवस्थानने शासनापुढे तीन पर्याय दिले होते. त्यातील वाहनाने, किंवा हॅलिकॉप्टरने चलपादुका नेण्याचा निर्णयास अनुमती दिली. त्यानुसार नियोजन सुरू आहे. 50 लोकांची परवानगी मागितली होती त्यास नकार मिळाल्यावर आम्ही 35 लोकांची परवानगी मागितली आहे.
– ऍड. विकास ढगे पाटील, प्रमुख विश्वस्त, आळंदी देवस्थान