नवी दिल्ली : “लव्ह आणि जिहाद” या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तलवार उचलून कुणाला तरी मारणं याला लोक जिहाद समजतात, हेही चूक आहे. भारताचे संविधान प्रत्येक पौढ नागरिकाला त्याच्या इच्छेनुसार जोडीदार निवडण्याचा अधिकार देतो. जर कुणी आपल्या पसंतीनुसार जोडीदार निवडून लग्न करत असेल तर त्यावर दुसऱ्यांना त्रास होण्याचे काय कारण? दुसरे असे की भाजपशासित राज्यात जिथे जिथे लव्ह जिहादचा कायदा बनला, तो असंवैधानिक आहे. भाजपाला प्रेमाचा एवढा राग का येतो? प्रत्येक गोष्टीला सांप्रदायिक रंग द्यायची गरज नाही, असे स्पष्ट मत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केले आहे.
नाशिक दौऱ्यावर असणारे असदुद्दीन ओवैसी यांनी,”महाराष्ट्रात शेतकरी अडचणीत आहे, त्यावर काही बोलले जात नाही. महाराष्ट्रातील युवकांचे ज्वलंत प्रश्न आहेत, त्यावर बोलायला तयार नाहीत.”, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी दिली. मध्य प्रदेशने केलेल्या कायद्यावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती आणली आहे. लव्ह जिहादच्या बाता मारणाऱ्या भाजपा पक्षातील अनेकांनी धर्माच्या बाहेर जाऊन लग्न केलेले आहे. पण आपण कोणत्या विषयावर चर्चा करत राहायची, असे देखील त्यांनी म्हटले.
पुढे बोलताना,”आज देशात बेरोजगारी हाच मोठा मुद्दा आहे. महागाई सहा टक्क्याने वाढली आहे. बेरोजगारी आठ टक्क्यांवर आली आहे, जगात सर्वात जास्त बेरोजगारी आपल्याकडे आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेले आहेत. हे सोडून जे लग्न करतायत त्यांच्यामध्ये तुम्ही का पडतायत?” असा सवाल देखील असदुद्दीन ओवैसी यांनी यावेळी उपस्थित केला.
भाजपाकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे. देशात जेव्हापासून भाजपाचे सरकार आलंय तेव्हापासून अल्पसंख्याक, दलित आणि वंचित समाज त्रस्त आहे. मॉब लिंचिग, बेकायदेशीररित्या घरे उध्वस्त करणे, उत्तराखंडमध्ये चार हजार घरात राहणारे ७० हजार लोक एवढ्या कडाक्याच्या थंडीत बाहेर कुडकुडत आहेत. तिकडे लक्ष द्यायला भाजपाला वेळ नाही, अशीही टीका यावेळी औवेसी यांनी केली.