मुंबई : राज्यात २ जुलै रोजी झालेल्या मोठ्या राजकीय भूकंपानंतर राज्यातील समीकरणे पूर्णपणे बदलेली पाहायला मिळाली होती. मात्र दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर आता अजित पवार गटाचे सर्व नेते आज शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना सुप्रिया सुळे यांचा फोन आला असून हे देखील वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी पत्रकारांनी या बैठकी मागचे कारण विचारले असता त्यांनी काहीच माहित नसल्याचे सांगितले आहे.
या बैठकीत आज अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ, दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, आत्राम मेश्राम आणि अदिती तटकरे हे सर्व वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे नेमकी ही भेट कशासाठी आहे याचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. देवगिरीवरील बैठकीनंतर हे सर्व मंत्री शरद पवारांच्या भेटीला आल्याने राज्यात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडणार का असा सवाल उपस्थित होत आहे.