मुंबई : राज्यात २ जुलै रोजी झालेल्या मोठ्या राजकीय भूकंपानंतर राज्यातील समीकरणे पूर्णपणे बदलेली पाहायला मिळाली होती. मात्र दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर आता अजित पवार गटाचे सर्व नेते आज शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि इतर ८ बड्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली तेंव्हापासून ते आजपर्यंत या दोन्ही गटाकडून एकमेकांवर शाब्दिक हल्ले करण्यात येत होते. मात्र आज अजित पवार यांनी दोन दिवसापूर्वी शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकमध्ये जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या काकीची भेट घेण्यासाठी गेलो होतो असे स्पष्टीकरण दिले होते.
दरम्यान, आज अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ, दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, आत्राम मेश्राम आणि अदिती तटकरे हे सर्व वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे नेमकी ही भेट कशासाठी आहे याचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. देवगिरीवरील बैठकीनंतर हे सर्व मंत्री शरद पवारांच्या भेटीला आल्याने राज्यात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे.