नवी दिल्ली -विद्यमान लोकसभेची मुदत लवकरच संपेल. त्या मावळत्या लोकसभेतील तब्बल २० जागा सध्या रिक्त आहेत. त्यामध्ये पुणे मतदारसंघाचाही समावेश आहे. त्याशिवाय, खासदारकी रद्द झाल्याने तृणमूल कॉंग्रेसच्या पश्चिम बंगालमधील नेत्या महुआ मोईत्रा यांची त्या राज्यातील जागाही रिक्त आहे.
राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तिसगढ या राज्यांत नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांत विजयी झाल्याने भाजप आणि कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी खासदारकीचे राजीनामे दिले. त्यामध्ये राज्यवर्धन राठोड, दिया कुमारी, बालक नाथ, नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हाद पटेल, राकेश सिंह, गोमती साई, रेणुका सिंह, अरूण साव या भाजप नेत्यांचा समावेश आहे.
त्याशिवाय, तेलंगणाचे मुख्यमंत्री ए.रेवंत रेड्डी, उत्तमकुमार रेड्डी, कोमतीरेड्डी वेंकट रेड्डी (सर्व कॉंग्रेस) आणि बीआरएसचे कोथा प्रभाकर रेड्डी यांनी खासदारकीचे राजीनामे दिले. पुण्यातील लोकसभेची जागा सर्वांधिक काळपासून रिक्त आहे. लोकसभेत पुणे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे भाजपचे नेते गिरीश बापट यांचे मागील वर्षी मार्चमध्ये निधन झाले.