कर्जत : करोना काळात कामेच बंद असल्याने आदिवासींना कामे मिळत नव्हती. तसेच तालुक्याच्या ठिकाणी बाजारपेठेत रस्त्याच्या दुतर्फा पाट्या घेऊन भाजीपाला विकण्यासही त्यांना बंदी होती, परिणामी या काळात आदिवासी आर्थिक विवंचनेत अडकले; मात्र अखेर करोनाचा प्रभाव काहीसा ओसरताच कर्जतच्या बाजारपेठेत आदिवासी बांधव पाट्या घेऊन बसलेले सकारात्मक चित्र पुन्हा नजरेस पडले असून; याच बरोबर भात झोडणीचा हंगाम सुरू झाल्याने सध्या अनेक शेतांमध्ये आदिवासी रोजंदारीवर भात झोडणी करताना दिसत आहे. यामुळे त्यांच्या हाताला काम मिळाल्याने त्यांचे जनजीवन पूर्वपदावर येण्यास प्रारंभ झाला आहे.
करोना काळात सात महिन्यांपासून मजुरीपासून वंचित राहिलेल्या आदिवासींना अखेर भातलावणी ते भात झोडणीच्या शेतीच्या कामातून रोजगार उपलब्ध झाला असून, स्थानिक पातळीवर रोजगार मिळाल्याने त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
देशभरात करोनाचा प्रभाव रोखण्यासाठी लागू केलेल्या ताळेबंदीमुळे हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी आदिवासी मजुरांची मजुरी अभावी सर्वाधिक विंवचना झाली होती. त्यातच आता पावसाने दिलेली उघडीप आणि भात झोडणीच्या हंगामामुळे बहुतांश आदिवासी मजूर कुटुंबाना स्थानिक गाव पातळीवरच मजुरी मिळत असल्यामुळे चार पैसे हाती पडत आहेत.
महिला असो की पुरुष प्रतिदिन सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत भात झोडणीच्या काम केल्यावर त्यांना अडीशे ते तीन रुपये मिळत असल्याचे जांभूळवाडी येथील आदिवासी रवी भोई यांनी सांगितले.