नवी दिल्ली – देशाच्या ज्या ज्या राज्यांमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार असेल त्या सर्व राज्यांमधील कंत्राटी कामगारांना सेवेत कायम केले जाईल अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. आपचे सरकार असलेल्या पंजाबमध्ये शिक्षक दिनाच्या दिवशी म्हणजे 5 सप्टेंबर त्या राज्यीाल 8736 शिक्षकांना सेवेत कायम करण्याची घोषणा त्या राज्याचे मुख्यमंत्र भगवंत मान यांनी केली होती.
याबाबत बोलताना केजरीवाल म्हणाले की, ही घोषणा केवळ पंजाब राज्यापुरती नाही. तर संपूर्ण देशासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी ही अत्यंत महत्वाची घोषणा आहे. सध्या सगळीकडे अशी हवा चालवली जाते आहे की सरकारी नौकऱ्या बंद करा, कायमस्वरूपी सरकारी कर्मचारी भरती करू नका, त्यांना कंत्राटी पध्दतीनेच कामावर ठेवा.
या कर्मचाऱ्यांचे संपूर्ण आयुष्यच कंत्राटी पध्दतीवर निघून जाते. पण ते सेवेत कायम होत नाहीत. देशात पहिल्यांदाच मान यांच्या सरकारने इतक्या कर्मचाऱ्यांची सेवा कायम केली आहे. पंजाबमध्येही इतरही अनेक कर्मचारी आहेत. त्या सगळ्यांबाबतही मान सरकार निर्णय घेणार आहे. कोणी जर उद्या या निर्णयांना कोर्टात आव्हान दिले तर माघार घ्यावी लागू नये म्हणून हे निर्णय घेण्यास थोडा विलंब होतो आहे.
जे कर्मचारी सेवेत कायम होतात ते काम करत नाही अशी पक्की समजुत देशात झाली आहे. मात्र ती चुकीची आहे. दिल्लीत आम्ही ते सिध्द करून दाखवले. आमच्याकडे शिक्षण क्षेत्रात जी क्रांती झाली ती या शिक्षकांनी आणि गेस्ट म्हणून आलेल्या शिक्षकांनीच करून दाखवली आहे याकडे केजरीवाल यांनी लक्ष वेधले.