नवी दिल्ली – भाजपने दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेऊन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच, नव्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात केजरीवाल यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. त्याचा संदर्भ देऊन भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केजरीवाल यांना लक्ष्य केले.
त्या आंदोलनाचे रूपांतर आता केजरी भ्रष्टाचार क्रांतीमध्ये झाले आहे. भारतीय राजकारणाने दशकभरात एवढी घसरण कधीच पाहिली नाही, असे त्यांनी म्हटले.
तर, अटकेत असताना मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार केजरीवाल यांना राहिला नसल्याची प्रतिक्रिया दिल्ली भाजपचे अध्यक्ष विरेंद्र सचदेव यांनी दिली.