MNS Raj Thackeray Gudi Padwa Melava: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला पाठिंबा दिला आहे. फक्त नरेंद्र मोदींसाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा, अशी घोषणा त्यांनी आज मंगळवारी (दि. 9 एप्रिल) शिवतीर्थावर आयोजित गुढीपाडवा मेळाव्यात केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, मला कशाचीही अपेक्षा नाही, देशाच्या भवितव्यासाठी सक्षम नेतृत्व हवे म्हणून केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर देखील हल्लाबोल केला. तुमचा पक्ष फोडला म्हणून तुम्ही आरोप करता, पण सत्तेत असताना तुम्ही मलाई खाल्ली नाही का, असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना केला.
येणारी निवडणूक या देशाचे भविष्य ठरवणार आहे –
राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र कर भरतो. तेवढाच निधी वाट्याला यावा, अशी अपेक्षा आहे. येणारी निवडणूक या देशाचे भविष्य ठरवणार आहे. अनेक निवडणुका येतील. विधानसभा निवडणुका येतील. त्यामध्ये काय होईल? मी इथेच गेल्यावर्षी सभेत महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला आहे, असं सांगितलं होतं. कोणती सोंगटी कुठे पडलीये माहिती नाही. माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी जीन्स घालून ट्रॅक्टरवर बसलेला हवा आहे. सर्वात तरुण देश आज भारत आहे. सर्वाधिक तरुण ना अमेरीका आहे ना जपान आहे. या तरुण तरुणींना चांगल्या शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने काम केलं पाहिजे. उद्योगपतींनी देश सोडून जाऊ नये. 10 वर्षानंतर देश म्हातारा व्हायला लागेल. तरुणांकडे मोदींनी लक्ष दिले पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे.
महाराष्ट्रातील लोकांवर, मराठी माणसावर, मराठी भाषेवर टोकाचं प्रेम करतो –
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, मी जे ऐकत होतो. ते 5 वर्षात दिसत नाहीये. ज्या गोष्टी मला पटलेल्या नाहीत ते पटलेल्या नाहीत. ज्या गोष्टी चांगल्या वाटल्या त्याच कौतुक करणार नाही आवडल्या तर टीका करणार आहेच. माझा राग टोकाचा आहे. महाराष्ट्रातील लोकांवर, मराठी माणसावर , मराठी भाषेवर टोकाचं प्रेम करतो. मात्र, मला तशी गोष्ट दिसली नाही तर स्वत: विरोध करतो. 370 कलम रद्द झालं तेव्हा अभिनंदन केलं. ज्या गोष्टी चांगल्या घडल्या त्याच अभिनंदन केलं. ज्यावेळी एक माणूस एका प्रांताचा विचार करतोय नाही म्हटलं. मी कधीही व्यक्तीगत टीका करतो. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत नरेंद्र मोदींवर व्यक्तीगत टीका करतात. मी तशी केली नाही. मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून मी टीका करत नाही. तुम्हाला सत्तेत हाकलून दिलं म्हणून तुम्ही त्यांच्यावर टीका करतात. तुम्हाला काय हवंय हे सांगण्यासाठी आणि मांडण्यासाठी मी आलोय.
महायुतीसोबत गेलो तर वाईट काय? – बाळा नांदगावकर
दरम्यान, सभास्थळी दाखल झाल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सूचक विधान केले. हिंदुत्वासाठी आम्ही महायुतीसोबत गेलो तर त्याचा फायदा होणार आहे, या आधीही शिवसेनेत असताना आम्ही भाजपसोबत होतो, त्यामुळे आता जरी एकत्र आलो तर त्यात काही नवीन नसणार असं बाळा नांदगावकर म्हणाले.