नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची सोमवारी तिहार तुरूंगात रवानगी झाली. त्यामुळे सध्या तुरूंगात असणारे ते आपचे चौथे नेते ठरणार आहेत. दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ईडीने केजरीवाल यांना अटक केली.
त्यांना आता १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. न्यायालयाच्या त्या आदेशानंतर केजरीवाल यांना दिल्लीतील तिहार तुरूंगात हलवण्यात आले. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, माजी मंत्री सत्येंद्र जैन, खासदार संजय सिंह हे आपचे तीन नेते आधीपासूनच तुरूंगात आहेत.
सिसोदिया आणि सिंह यांना मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणीच अटक करण्यात आली. त्यामुळे त्या प्रकरणात अटक झालेल्या आपच्या नेत्यांची संख्या तीन इतकी झाली आहे. जैन यांना मनी लॉण्डरिंगच्याच वेगळ्या प्रकरणात अटक करण्यात आली.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात आपचे प्रमुख चार नेते तुरूंगात कैदेत आहेत. त्यामुळे त्या पक्षाच्या प्रचार मोहिमेवर मोठा प्रतिकूल परिणाम होणार आहे. आप हा विरोधी पक्षांच्या इंडिया या आघाडीचा घटक आहे.