नवी दिल्ली – करोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 हजार रूपये आर्थिक मदत देण्याची महत्वपुर्ण घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. अशा प्रकारची मदत घोषित करणारे दिल्ली हे देशातले पहिले राज्य ठरले आहे. ज्या कुटुंबातील कर्ता पुरूष करोनामुळे गेला आहे त्या कुटुंबाला दर महा 2500 रूपयांचे वेगळे आर्थिक सहाय्य दिले जाईल अशी घोषणाही त्यांनी केली आहे.
आज पत्रकार परिषदेत बोलताना केजरीवालांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की दिल्लीत करोनाच्या चार लाटा आल्या. चौथ्या लाटेचा फटका मोठा होता व त्यात जवळपास प्रत्येक कुटुंबातील किमान एक जण दगावला आहे. या लाटेमुळे अनेक मुले अनाथ झाली आहेत. अनेक कुटुंबांनी कर्त्या माणसाला गमावले आहे.
अशा कुटुंबाना मदत करणे हे प्रत्येक जबाबदार सरकारचे काम आहे. हे लक्षात घेऊन आम्ही ही मदतीची योजना सुरू करीत आहोत. या योजनेसाठी आम्ही एक पोर्टल सुरू करीत असून संबंधीतांनी त्यावर अर्ज करावेत असे आवाहन त्यांनी केले. या कुटुंबाच्या घरी आमच्या सरकारचे प्रतिनिधी जातील आणि ते तेथे जाऊन संबंधीतांची आवश्यक ती कागदपत्रे भरून घेतील. कागदपत्रे उपलब्ध नाहींत म्हणून कोणत्याही कुटुंबांच्या मदतीचा हक्क नाकारला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोणालाही नाराज करू नका, कोणालाही दु:खी करू नका असा सल्ला आम्ही सर्व सरकारी प्रतिनिधींना दिला आहे असेही केजरीवाल यांनी सांगितले. ही योजना मुख्यमंत्री कोविड 19 परिवार आर्थिक सहायता योजना या नावाने राबवण्यात येणार असून त्याची आधिसूचना या आधीच म्हणजे 22 जुनला जारी करण्यात आली आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
करोनामुळे मरण पावलेल्यांच्या कुटुबांना आर्थिक मदत करा अशा मागणीच्या अनेक याचिका सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबीत आहेत. पण अशी मदत करणे अशक्य आहे अशी भूमिका मोदी सरकारने कोर्टात घेतली आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांच्या सरकारने थेट मदत योजना सुरू केल्याने त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे.