मुंबई – महाराष्ट्र विधिमंडळाने रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना दुसऱ्यांदा हक्कभंगाची नोटीस बजाविली आहे. त्यांच्यावर विधिमंडळाने गोपनीयतेच्या अटीवर दिलेले कार्यवृत्त परवानगीशिवाय न्यायालयात सादर केल्याचा आरोप आहे. त्यांनी दोनवेळी विधिमंडळाचा हक्कभंग केल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे. यामुळे अर्णब गोस्वामी यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत.
विधिमंडळाने पावसाळी अधिवेशनात अर्णब गोस्वामी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख आणि सरकारची विनाधार बदनामी केल्याच्या आरोपाखाली हक्कभंग नोटीस बजाविली होती. या नोटीससोबत विधिमंडळाने अर्णब गोस्वामी यांना माहितीसाठी त्या दिवशीचे कार्यवृत्त देखील गोपनीयतेच्या अटी-शर्ती घालून दिले होते.
या अटी शर्तींनुसार विधिमंडळाच्या अध्यक्षांच्या परवानगीशिवाय विधिमंडळाचे कार्यवृत्त न्यायालयीन अथवा इतर कोणत्याही कामकाजासाठी वापरता येऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले होते.
अर्णब गोस्वामी यांनी पहिल्या हक्कभंगाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्यावेळी त्यांनी विधिमंडळाच्या अध्यक्षांची परवानगी न घेताच विधिमंडळाचे कार्यवृत्त न्यायालयात सादर केले.
यामुळे अर्णब गोस्वामी कायदेशीर पेचात अडकण्याची दाट शक्यता आहे. विधिमंडळाने अर्णब गोस्वामी यांची ही कृती विधिमंडळाच्या विशेषाधिकाराचा भंग असल्याचे सांगत दुसऱ्यांदा नोटीस बजाविली आहे.