गुरगाव : चीनमधील वुहान प्रांतात अडकलेल्या सुमारे चारशे भारतीयांना येत्या काही काळात देशात आणण्यात येणार आहे. त्यांना विलगता कक्षात ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यापासून ही साथ भारतात पसरू नये यासाठी ही तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी लष्कराने हरीयाणातील मनेसर येथे तात्पुरता विलगता कक्ष उभारला आहे.
चीन सरकारने अन्य राष्ट्रांनी त्यांचे नागरीक घेऊन जाण्याचे आवहन चीनने शुक्रवारी केले. जर विमान कंपन्या येण्यास तयार नसतील तर विमाने देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे अमेरिका इंग्लंड या देशांनी आपले प्रवासी मायदेशात नेण्यास सुरवात केली. ऑस्ट्रलिया, फ्रान्स, न्युझिलंड आदी देशांनी आपले नागरीक येत्या दोन दिवसांत नेण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील अडकलेल्या नागरिकांना आण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
येत्या दोन दिवसांमध्ये त्याची कार्यवाही केली जाण्याची शक्यता आहे. भारतात थेट या प्रवाशांना समाजामध्ये मिसळू दिल्यास अनर्थ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हरीयाणातील मनेसर येथे विलगता कक्ष उभारण्यात आला आहे. तेथे त्यांची लष्कर अणि विमानतळ प्राधिकरणाकडून त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. यातील संशयितांना स्वतंत्र ठेवण्यात येणार असल्याचे समजते.
दरम्यान, कोरोना विषाणूचा पहिला बाधीत केरळात गुरूवारी आढळला. तो वुहान विद्यापीठात शिकत आहे. या रूग्णाची कोरोना विषाणूची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून त्याला रुग्णालयात विलगता कक्षात ठेवण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थीर असून त्याच्यावर बारकाईने वैद्यकीय देखरेख ठेवण्यात येत आहे.
दरम्यान केरळचे आरोग्य मंत्री केके शैलजा यांनी तातडीने आरोग्य संचनालायाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. जगभराला धोका निर्माण झालेल्या कोरोना विषाणूचा उगम चीनमधील वुहान येथे झाल्याचे मानण्यात येते. आता पर्यंत त्यात 170 जणांचे बळी गेले आहेत.
केरळमध्ये त्रिसूर, थिरुवनंतपूरम, पठाणमथ्थीला आणि मल्लपुरम येथे प्रत्येकी एक संशयित रुग्ण आढळला. त्यांना विविध रुग्णालयात विलगता कक्षात ठेवण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून भारत सरकारच्या आरोग्य खात्याने अनेक जणांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवले आहे. चीनमधून आलेल्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी विमानतळावरच करण्यात येत आहे.