बेतुल गोवा – डिझेल विक्रीत तेल कंपन्यांना प्रति लिटरला तीन रुपयाचा तोटा होत आहे. तर पेट्रोल विक्रीतील नफा बराच कमी झाला असल्याचे सांगितले जाते. निवडणुकामुळे पेट्रोल डिझेलच्या दरात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना गेल्या पंधरवड्यात जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे हे दर कमी करता येणार नाहीत असे विश्लेषकांना वाटते.
भारतात तीन मोठ्या सरकारी कंपन्या इंधन वितरणाचे व्यवहार जास्त प्रमाणात करतात. गेल्या दोन वर्षापासून या कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कसलाही बदल केलेला नाही. बाजारपेठेतील किमतीनुसार या कंपन्यांना पेट्रोल डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात बदल करण्याचे अधिकार दिले आहेत. मात्र तरीही त्याना असा बदल करणे गरजेचे वाटले नाही असे या तेल कंपन्यांनी सूचित केले आहे.
भारत आपल्या गरजेच्या तब्बल 85% खनिज तेल आयात करतो. त्यामुळे जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमती वाढल्यानंतर देशातील इंधनाच्या किमती कमी जास्त होण्याची अपेक्षा असते. मात्र तसे गेल्या दोन वर्षापासून झालेले नाही. सध्याच्या खनिज तेलाच्या किमतीनुसार डिझेल विक्री त्या कंपन्यांना तीन रुपयाचा तोटा होत आहे. तर पेट्रोल विक्रीत अल्प प्रमाणात नफा होत आहे.
या संदर्भात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हारदिप सिंग पुरी यांना विचारले असता सरकारचे या कंपन्यावर नियंत्रण नाही, त्यामुळे या कंपन्या त्यांचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत असे त्यांनी सांगितले. या तेल कंपन्यांना पहिल्या नऊ महिन्यात 69 हजार कोटी रुपयांचा नफा झाला आहे. जर आगामी काळातही नफा चालू राहिला तर त्या कंपन्या दरात कपात करतील असे त्यांनी सुचित केले.