लखनौ – अयोध्येवर अन्याय झाला होता. पांडवांवरही अन्याय झाला होता. त्यावेळी श्रीकृष्ण कौरवांकडे गेले होते. पांडवांसाठी केवळ पाच गावे द्या अशी मागणी त्यांनी कौरवांकडे केली होती. मात्र तसे झाले नाही. अयोध्येबाबत तेच झाले, मथुरेबाबत तेच झाले आणि काशीबाबतही तेच झाले.
तेथील आस्था केवळ तीन जागांबद्दल बोलते आहे आणि त्यांंची मागणी करते आहे असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होते. त्यावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली असून पांडव कोण आणि कौरव कोण हे कोण ठरवणार असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
अखिलेश म्हणाले की आमच्यासाठी देशाचे संविधान आणि न्यायालय सर्वश्रेष्ठ आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या संदर्भात ते म्हणाले की भारतीय जनता पार्टीला केवळ पक्ष फोडण्याचे माहिती आहे. कोणाला केंव्हा सोबत घ्यायचे हे त्यांना समजते. त्यांना बेईमानी कशी करायची हेही माहिती आहे आणि कोणाकडे ईडी आणि आयटीला पाठवायचे हेही त्यांना समजते.
गुन्हे वाढत आहेत, भ्रष्टाचार वाढतो आहे मात्र भाजपकडे त्याचे उत्तर नाही. युध्दग्रस्त इस्त्रायल येथे नोकरीसाठी जाण्यासाठी युवक तयार झाले आहेत. एक लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्याचे उत्तर मात्र भाजप देत नाही अशी टीका अखिलेश यांनी केली.