श्रीकांत कात्रे
ग्रामीण भागातील छोट्याशा गावात व्यवसाय उभा करणे म्हणजे जिकिरीचे काम. मर्यादित क्षेत्रातील उलाढालीलाही मर्यादा येतात. त्यात एखादी महिला जिद्दीने व्यवसायात उतरली तर अनेक अडचणींना तोंड देत मार्ग काढावा लागतो. अर्चना सावंत यांनीही स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मोठी धडपड केली. कष्ट करण्याची तयारी ठेवून व्यवसाय करत आपल्या संसाराला आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. बरेच अडथळे येत गेले. त्यांनी चिकाटीने व्यवसाय सुरू ठेवला. संकटाची तमा न बाळगता पुढे चालत राहण्याची जिद्द दाखवली. म्हणूनच त्या आज व्यवसायात जम बसवित आहेत.
आपल्याकडील अनेक खेडी शेतीवर अवलंबून आहेत. त्यात दुष्काळी भागातील समस्या अजूनच वेगळ्या असतात. अनेक संकटांना सामोरे जात साऱ्यांचीच जगण्याची धडपड असते. कुटुंबाला स्थिरता देण्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नसतो. अर्चना सावंत यांच्या जगण्याचा संघर्ष असाच आहे. दुष्काळी माण व खटाव तालुक्यांच्या सीमेजवळील निढळसारख्या छोट्याशा गावात छोटा व्यवसाय करून त्या जगण्याची लढाई लढत आहेत. आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी काबाडकष्ट करत आहेत. एकत्रित कुटुंब. घरची थोडीफार शेती, पतीचे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान. पण जेमतेम उत्पन्न. आपणही काही तरी केले पाहिजे, असा विचार अर्चना यांच्या मनात वारंवार येत होता.
मार्ग सापडत नव्हता.
सातारा त्यांचे माहेर. दहावीपर्यंतच शिक्षण झालेले. सासरी आल्यावर पतीचे डीश, टीव्ही, पंखे, मिक्सर दुरूस्तीचे दुकान सुरू होते. पण गावाजवळ दहिवडी व पुसेगाव ही दोन मोठी गावे असल्यामुळे त्या व्यवसायालाही मर्यादा होत्या. कुटुंबाच्या आर्थिक स्थिरतेसाठी काही करण्याची जिद्द मोठी असली तरी छोट्या गावात स्वतंत्रपणे काही करणे महिलेपुढे आव्हानच ठरते. विचारविनिमय करूननर्सिंगचा एक वर्षाचा अभ्यासक्रम करण्यासाठी त्यांनी प्रवेश घेतला.
मात्र, घरातील अडचणींमुळे त्यांची ती इच्छाही पूर्ण होऊ शकली नाही. मग गावात घरी राहूनच काही करता आले तर काही व्यवसाय करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. चपला तयार करून विक्री करण्याचा घरचा पारंपरिक व्यवसाय त्यांना आठवला. चुलत सासरे तसेच सासूबाई हा व्यवसाय करायच्या. परंतु, पतीने वगेळ्या व्यवसायाची वाट निवडल्याने ती परंपरा खंडित झाली होती.
हाच व्यवसाय आपण पुढे नेऊया, या जिद्दीने त्या कामाला लागल्या. चप्पल बनविण्याची कारागिरीही त्यांनी थोड्याफार प्रमाणात शिकून घेतली. पण तयार माल आणून दुकान सुरू करण्याचे नियोजन त्यांनी केले. भांडवलाचा प्रश्न पुन्हा उभा राहिला. त्याचदरम्यान माणदेशी फाउंडेशनच्या बॅंक सखी प्रतिभा भोंडवे यांची भेट झाली. व्यवसायासाठी प्रोत्साहन मिळू लागले. भांडवल म्हणून बिनव्याजी पाच हजारांचे कर्ज मिळाले. गावात फूटवेअरचे दुकान सुरू केले.
साताऱा शहरातून माल आणायचा आणि विक्री करायची असे सुरू झाले. व्यवसायाच्या मर्यादाही त्यांच्या लक्षात आल्या. मग शेतीमधील कामाकडेही त्या थोडे लक्ष देऊ लागल्या. आणखी काही केले पाहिजे, असे त्यांना सतत वाटत राहिले. इतर व्यवसायासाठी प्रशिक्षण घेतले. मग काही फळे आणून ती विकण्याचा प्रयत्नही करून पाहिला. पण गावातील लोकं शेजारच्या मोठ्या गावांत कामानिमित्त जात असल्यामुळे तेथूनच फळे घेऊन येत असतात. या मर्यादा व स्पर्धा लक्षात घेता अजूनही अडचणी आहेतच.
शुक्रवारी आठवडा बाजार असतो. त्यादिवशी थोडीफार उलाढाल वाढते. माणदेशीकडून वेळोवेळी मिळालेल्या प्रोत्साहनामुळे आणि व्यवसायाच्या मार्गदर्शनामुळे व्यवसायात जम बसू लागला. लॉकडाऊनमध्ये मोठा संघर्ष करावा लागला. त्यांचा व पतीचा असे दोन्ही व्यवसाय बंद राहिले. उत्पन्नाचे पूर्ण साधनच बंद झाले. कठीण खडतर काळातील या संकटावर मात करत पुहा जिद्दीने सावरण्यात त्यांना यश मिळाले. गावातील दुकान मोठे करायचे हे त्यांचे स्वप्न आहे.
मुलगा पहिलीत आहे तर मुलगी चार वर्षांची आहे. दोघांनाही खूप शिकवायचे आहे. त्यासाठी वाटेल तेवढे काबाडकष्ट करण्याची तयारी त्यांनी ठेवली आहे, असे त्या सांगतात. आईवडलांनी आपले पालनपोषण करताना किती खस्ता खाल्ल्या याची त्यांना आठवण येते. त्यांनी आपल्यासाठी काटकसर करत व प्रसंगी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवल्या. त्यामुळेच आज आपण थोडेतरी स्थिर दिवस पाहत आहोत, असे त्या सांगत होत्या. त्यामुळे मुलांना काहीही पडू देणार नाही, विशेषतः मुलीला खूप शिकवायचे आहे, असे त्या सांगतात. ही त्यांची इच्छाशक्तीच खूप काही सांगून जाते. ग्रामीण महिला असा विचार करू शकते, हेच वेगळेपण आहे. संसाराच्या प्रगतीसाठी सातत्याने धडपडणाऱ्या अर्चना सावंत यांचा प्रवास म्हणूनच अनुकरणीय आहे.