पिंपरी – रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या महिला, नागरिकांच्या गळ्यातील दागिने, मोबाइल फोन, पर्स हिसकावण्याचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत वाढलेले आहे. यावर्षी अकरा महिन्यात 428 जबरी चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील 129 गुन्हे हे दागिने हिसकावल्याचे आहेत. तर उर्वरित 299 गुन्ह्यांमध्ये मोबाइल, पर्स आणि इतर ऐवज चोरीला गेला आहे. तर शहरात वर्षभरात 431 घरफोड्या झाल्या आहेत. हे प्रमाण मागील पाच वर्षातील सर्वाधिक आहे.
पिंपरी-चिंचवड शहर हे चोरट्यांचा अड्डा बनत चालले आहे. दरोडा, घरफोडी आणि जबरी चोऱ्या अशा चोरीच्या विविध प्रकारांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. रात्रीच्या वेळी चोरी, दरोड्याच्या घटना सर्वाधिक घडतात. रात्रीच्या वेळी गुन्हे घडू नये, परिसरात शांतता राहावी, यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ग्रामसुरक्षा दलाची सुरुवात केली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने समाजाच्या सुरक्षेसाठी समाजातील काही प्रतिनिधींचा पोलीस गस्तीसाठी समावेश करून अधिक चांगली गस्त घालणे हा ग्रामसुरक्षा दलाची सुरुवात करण्यामागे उद्देश ठेवण्यात आला. ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य, पोलीस रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना देखील गुन्हे घडतच आहेत. किंबहुना त्यामध्ये वाढ होत आहे.
गर्दीच्या ठिकाणी सोनसाखळी, पर्स, मोबाईल हिसकावण्याचे प्रकार घडतात. हे प्रकार परिसरातील दुकानदारांच्या मदतीने घडत असल्याच्या तक्रारी नागरिक करतात. पण तसे पुरावे न मिळाल्याने संबंधित दुकानदारांवर कारवाई होत नाही. अनेकजण मोबाईल, दागिने चोरीला गेल्यानंतर पोलिसात तक्रार देण्यासाठी टाळाटाळ करतात. दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये त्या गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण अतिशय कमी असते.
अनोळखी चोरटे चोरी करून स्पोर्ट बाइकवरून पळून जातात. चोरट्यांची ओळख न पटल्यामुळे चोरटे पुन्हा उघडपणे चोऱ्या करतात. मागील पाच वर्षात चोरीच्या वेगवेगळ्या प्रकारचे 3 हजार 612 गुन्हे पोलीस दप्तरी दाखल आहेत. त्यात 200 दरोडे, 1802 घरफोड्या आणि 1610 जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
दुचाकीवरून येणारे चोरटे रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावतात. जबरी चोरी करताना गळ्यातील दागिने तुटले नाहीत तर संबंधित महिलांचे गळे कापले गेल्याचे प्रकारही घडले आहेत. दुचाकीवरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने संबंधित महिला रस्त्यावर पडून गंभीर अपघात झाले आहेत. चिंचवड येथे चोरी करून पळून जाणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करताना त्या चोरट्यांनी थेट पोलिसांवरच खुनी हल्ला केल्याचाही प्रकार घडला आहे.
फक्त चोरटे दिसून उपयोग नाही त्यांना पकडता आले पाहिजे
स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात शेकडो कॅमेरे बसविण्यात आले. केवळ चौकाचौकात वाहतुकीवर लक्ष ठेवणे आणि नियमभंग करणाऱ्या वाहनांवर चलन कारवाई करणे हे दोनच उद्देश त्यातून सफल होत आहेत. स्मार्ट कॅमेऱ्यात फेस रिडींग सारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे एकदा चोरी केलेला चोरटा कुठल्या परिसरात फिरतो, त्यासह तडीपार आणि अन्य गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर पोलिसांना वॉच ठेवणे सोयीस्कर होईल. नियंत्रण कक्षातील स्क्रीनवर चोरटे पळताना दिसून उपयोग नाही तर त्यांना तात्काळ पकडणे देखील तितकेच महत्वाचे आहे. त्यासाठी सर्व गुन्हेगारांचे स्मार्ट रेकॉर्ड तयार करून ते स्मार्ट सिटीच्या कॅमेऱ्यांना लिंक करणे आवश्यक आहे.