पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुखांना बडतर्फ करण्याची मागणी
पिंपरी – बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प नऊ वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. मावळात झालेल्या आंदोलनानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बंद जलवाहिनी योजनेला स्थगिती दिली होती. अद्यापही या प्रकल्पावर बंदी कायम असताना महापालिकेतील पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख रामदास तांबे यांनी वादग्रस्त आणि जुन्या सल्लागाराची परस्पद नियुक्ती केल्याने त्यांना महापालिका सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.
याबाबत खैरनार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार नोंदविली असून त्यामध्ये म्हटले आहे की, पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनीतून पाणी आणण्यात येणार आहे. त्यासाठी अठराशे मिमी व्यासाच्या दोन समांतर जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. संयुक्त भागीदारीत ठेकेदार नियुक्त केला आहे.
मात्र, शेतकऱ्यांनी विरोध करीत 9 ऑगस्ट 2011 मध्ये आंदोलन केले होते. त्या वेळी झालेल्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काम बंद करण्याचे आदेश जारी केले होते. तर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही जलवाहिनीच्या कामाला स्थगिती दिली होती. तेव्हापासून काम बंद आहे. याबाबत अद्यापही स्थगिती आदेश कायम असून, कोणताही निर्णय शासनस्तरावर झालेला नाही.
असे असतानाही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता रामदास तांबे यांनी प्रशासनाकडून कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तसेच या कामी सल्लागार नियुक्त करताना स्पर्धा न करताच जुन्या सल्लागाराची थेट नियुक्ती करण्याचा प्रस्ताव तयार केला व आयुक्तांच्या मान्यतेने तो स्थायी समितीसमोर आणला आहे.
परंतु ते करत असताना यापूर्वी या प्रकल्पाबाबत झालेले विविध निर्णय, स्थगिती आदेश, पालिकेचे झालेले मोठे आर्थिक नुकसान, सल्लागाराच्या चुकांमुळे शहराची झालेली बदनामी अशा विविध महत्वाच्या गोष्टीपासून स्थायी समितीला अंधारात ठेवले आहे. त्यामुळे तांबे यांच्या भूमिकेविषयी संशय निर्माण झाला आहे.
रामदास तांबे हे पदाचा गैरवापर करीत असून त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचेच तसेच शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे तांबे यांना महापालिका सेवेतून बडतर्फ करून त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी दिपक खैरनार यांनी केली आहे.