पाच मिनिटांत आले, हा गेलो आणि हा आलो अशी वाक्यं आपल्याला नेहमी ऐकू येतात आणि सामान्यत: ही पाच मिनिटं म्हणजे अर्धा तास ते पुढे कितीही वेळ. हा आलो म्हणणाऱ्यालासुद्धा वेळेच्या प्रवाहाची कल्पना नसते.
वेळेचं महत्त्व खरं तर सांगायची “वेळ’ येऊ नये. परंतु काम वेळेवर केलं तर पुढची अनेक संकटं टाळता येतात हे खरं आहे. इंग्रजीतील “अ स्टिच इन टाइम सेव्हज् नाइन’ ही म्हण या अनुभवावरूनच आली असणार. म्हणजे वेळेवर टाका घातला तर पुढील नऊ टाके वाचतात. वैद्यकीय क्षेत्रात तर याचं फार मोठं महत्त्व आहे. आपण वेळीच उपचार केले नाहीत तर व्याधी खूप गंभीर रूप धारण करू शकते आणि मग फार मोठी किंमत मोजावी लागते-कधी कधी आयुष्य गमावण्याचीसुद्धा. ऑफिसमधल्या एका मित्रानं अचानक छातीत दुखू लागलं, ते दुखणं अंगावर काढलं आणि बरेच दिवस घरगुती उपचार करत राहिला. अखेर त्याचा हृदयरोग बळावून त्याला काळानं हिरावून नेलं.
“ओ. हेन्री’ या विख्यात अमेरिकन लघू कथाकाराने या विषयावर एक उपहासात्मक लघुत्तम कथा लिहिली आहे. त्यामध्ये एक गृहस्थ दुसऱ्याला सांगतो की थांब, मी रस्ता ओलांडून येतोच. आणि कित्येक वर्षे लोटतात; पण तो गृहस्थ काही येत नाही. अशीच काहीशी गोष्ट एकदा माझ्या बाबतीत कित्येक वर्षांपूर्वी झाली. कुठल्या तरी दुरुस्तीसाठी मेकॅनिक बोलावला होता. पत्नीनं त्याला फोन करून विचारलं की तू कुठे आहेस. तो उत्तरला की घरासमोरच आहे आणि आलोच. तो मानव आजतागायत आलेला नाही. कधी अचानक दरवाजाची बेल वाजली की, आम्ही गमतीनं म्हणतो की बहुधा अनेक वर्षांपूर्वी आपण बोलावलेला तो मेकॅनिक आला असेल!
आपण भारतीयांना वेळेची खरोखरीच किंमत नाही, असं दिसतं. ठरलेल्या मुहूर्तावर लग्न लागलेलं पाहणं आजपर्यंत तरी माझ्या नशिबात आलेलं नाही. सॉरी, सर. उशीर झाला. वाटेत ट्रॅफिक हे वाक्य तर वापरून वापरून गुळगुळीत झालं आहे. काही काळापूर्वी आय.एस.टी. म्हणजे इंडियन स्टॅंडर्ड टाइम नसून इंडियन स्ट्रेचेबल टाइम म्हणजे आवश्यकतेनुसार कितीही खेचून घेता येणारा असा टाइम आहे, असा जोक होता. एकदा भारतीय रेल्वेगाडी वेळेवर स्टेशनात दाखल झाली तेव्हा रेल्वेच्या वक्तशीरपणाचं कौतुक झालं. मात्र एकानं भांडाफोड केली की ती गाडी त्या स्टेशनात त्या वेळी पण आदल्या दिवशी येणं अपेक्षित होतं! असाही विनोद प्रचलित होता.
विशेषकरून आपण भारतीयांसाठी कालव्यवस्थापन किंवा कालनियोजन अतिशय आवश्यक आहे. टाइम मॅनेजमेंट हा विषय शिकवलाही जातो म्हणे, पण आपण तो प्रत्यक्षात कधी उपयोगात आणणार हा खरा प्रश्न आहे.
टाइम इज मनी-हे तत्त्व मनात पूर्णपणे बिंबल्याशिवाय आपण वक्तशीर बनू शकणार नाही. सर्व प्रकारची शिस्त अंगी बाणल्यावरच हे शक्य होईल. कालव्यवस्थापनामुळे मात्र खूप फरक पडू शकेल. एका प्रसिद्ध अमेरिकन लेखकानं दैनंदिन व्यवहाराचं बारकाईनं निरीक्षण करून आपल्या पुस्तकात वेळ कसा वाचवायचा त्याची सूत्रं दिली आहेत. शर्टाची बटनं खालपासून वरपर्यंत लावत गेल्यास वेळ वाचतो असं त्याचं निरीक्षण आहे.
माझा स्वत:चा एक असा शिरस्ता आहे की एखाद्या खोलीतून एखादी वस्तू आणायची असेल किंवा तिथे एखादं काम करायचं असेल तर नजीकच्या काळात तिथल्या अजून कुठल्या वस्तू लागणार आहेत किंवा तिथे अजून काही कामं आहेत का ते क्षणभर आठवून मग तिथे जाऊन ती कामं करून टाकतो किंवा त्या वस्तू आणतो.
या योगे खूप वेळ वाचतो असं लक्षात आलं आणि वक्तशीरपणाला हातभार लागला. तसंच बाहेर एखाद्या ठिकाणी जाताना तिथली जवळपासची सर्व कामं आठवून यादी केल्यास खूप वेळ वाचतो. हल्ली स्मार्टफोनमुळे तर यादी करणं अधिकच सुलभ झालं आहे. अशा छोट्यामोठ्या युक्त्यांनी कालव्यवस्थापन करणं सहज शक्य आहे. चला तर कालव्यवस्थापन करून वक्तशीर बनू या.
– श्रीनिवास शारंगपाणी