जनसागरात आपण आपली ओळख गमावून बसलो, आपले अस्तित्वच संपवून बसलो असे होता कामा नये. जे आपल्याकडे आहे तेही चांगलेच आहे यावर विश्वास ठेवा आणि स्वतःचा अभिमान, आत्मसन्मान आपणच कसा जोपासायचा याविषयी थोडेसे…
आपण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात कार्यरत असतोच. आपण करत असलेले आपले काम आपल्याला आवडत असेल किंवा नसेलही. आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्राविषयी व आपल्या कामाविषयी आपल्या मनात अभिमान असायलाच हवा. भले आपले काम करताना आपल्याला खूप त्रास होत असेल. अनेक उणिवांच्या बाजू असतील, तरी आपण आपल्या कामाबाबत, आपल्या क्षेत्राबाबात कधीही तक्रार करावयाची नाही. आपण आपल्या मनाला त्याप्रमाणे कणखर बनवायचे आहे.
आपल्यापैकी बरेच जण असे असतात की, ते आपल्याच व्यवसाय बंधूबाबत नकारात्मक बोलत असतात. जसे एक सराफ दुसऱ्या सराफाच्या सोन्याला “हिणकस’ संबोधतो आणि स्वतःच्या सोन्याला “बावन्नकशी’ संबोधतो. अशा प्रकारे आपण आपल्या व्यवसायाबाबत, क्षेत्राबाबत काही चुकीचा संदेश ग्राहकांपर्यंत पोहोचेल असे बोलावयाचे नाही किंवा अशी कृती करावयाची नाही.
चक दे इंडिया (2007) या चित्रपटाबाबत हॉकी खेळाडू रंजन नेगी यांनी एक आठवण सांगितली ती अशी, प्रशिक्षक कबीर खान यांच्या दिशेने एक खेळाडू मुलगी हॉकीची छडी भिरकावते. जमिनीवर पडलेली ती छडी कबीर खान पायाने उंच उडवून पकडताना दाखवायचे, असा प्रवेश चित्रीत करण्यात येणार होता. पण नेगी यांनी असा प्रवेश चित्रीत करू नये असे दिग्दर्शकांना सुचविले. भारतात हॉकी खेळाडू आपल्या छडीला खूपच आदर देत असतो. याशिवाय छडीला पाय लावणे म्हणजे हॉकी खेळाचा अनादर केल्यासारखे आहे. देशातील हॉकी खेळाडूंच्या भावना लक्षात घेता अशा प्रकारच्या प्रवेशाचे चित्रीकरण रद्द करण्यात आले. हॉकी खेळाडूंप्रमाणे आपणही आपल्या कामाप्रती इतक्याच समर्पित भावनेने बघायला हवे.
एखादे काम आपल्या आवडीचे नसेलही केवळ नाईलाज म्हणून आपण करत असू. असे असले तरीही आपण करावे लागलेले काम पूर्णपणे समर्पित होऊनच करावयाला हवे. त्याचबरोबर नाईलाजाने करावे लागणारे कामही लवकरात लवकर बदलून दुसरे आपल्या आवडीचे काम करण्यासाठी प्रयत्न चालूच ठेवावे. आपण सध्या करत असलेले काम जरी थोडे दिवसांसाठी करणार असलो तरी मन लावूनच करावयाला हवे. आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी सध्याचे काम म्हणजे एक पायरी आहे हे लक्षात घ्यावे.
सध्या जे काम आपण करत आहोत त्याच कामामुळे आपले अस्तित्व आहे हे विसरून चालणार नाही. सध्याचे आपले काम आपण बदलू शकत नाही पण आपली आवड दुसऱ्याच क्षेत्रात आहे. अशा वेळी आपण दोन्ही साध्य करू शकतो. आपले कामही आपण चोख पार पाडू शकतो आणि आवडीचे क्षेत्रातही सांभाळू शकतो.
आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत त्या क्षेत्रात चांगले-वाईट अशी दोन्ही प्रकारची माणसे असतात, चांगल्या-वाईट अशा दोन्ही प्रकारच्या बाजू असतात. आपल्या क्षेत्राबाबत कोणी त्रयस्थ व्यक्ती जर काही नकारार्थी बोलत असेल, तर त्याच्या बोलण्याला उत्तेजन आपण द्यायचे नाही. एखाद्या व्यक्तीची कोणी कधी फसवणूक केली असेल, त्या अनुभवातून तो आपल्याशी काही बोलत असेल. याचा अर्थ असा नाही की आपल्या क्षेत्रातील सर्वच माणसे ही फसवणूक करणारी आहेत. त्याही पुढे जाऊन आपल्या क्षेत्रातील आणखीन काही वाईट बाजू आपल्याला माहीत असतात, त्याबाबत अशा त्रयस्थ व्यक्तीशी बोलायचे नाही. आपल्या क्षेत्राच्या काही उणिवेच्या बाजू असतील, जसे काम करताना आपल्याला कायम उन्हातच काम करावे लागत असेल तर अशा उणिवेच्या बाजूंचा आपल्याला किती त्रास होतो याची कधीही तक्रार करावयाची नाही. थोडक्यात, आपल्या क्षेत्राबद्दल कोणताही नकारात्मक संदेश आपण दुसऱ्यापर्यंत पोहोचवायचा नाही.
आपण जेथे काम करत आहोत तेथे गणवेश असेल, तर त्या गणवेशाबद्दलही आपण अभिमान बाळगला पाहिजे. गणवेश मळकट-कळकट असता कामा नये. तसेच पूर्ण गणवेश परिधान करणेही आवश्यक आहे. नाहीतर कोणी पट्टाच वापरत नाही, तर कोणी बिल्लाच लावत नाही, तर कोणी फक्त सदराच परिधान करेल. याशिवाय कोणी कामावर नसतानासुद्धा गणवेश परिधान करेल. गणवेशाबाबत असे काहीसे वागून आपल्या कामाचे अवमूल्यन आपणच स्वतः करीत आहोत. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तींना आपल्या क्षेत्राबाबत नकारात्मक संदेश देत असतो. याउलट आपण कडक गणवेश घालून जर काम करू लागलो तर एक सकारात्मक संदेश इतर व्यक्तींपर्यंत पोहोचवतो. आपण कामावर असताना कर्तव्यदक्ष राहण्याची जाणीव गणवेशामुळे होतच असते, यामुळेच आपल्या मनात कोठेतरी कामाविषयी अभिमान जागृत होत असतो.
आपल्या कामातून, वागण्यातून आपल्या पेशाविषयी आपला आदर अभिमान दिसला पाहिजे तरच इतर लोक आपल्या पेशाविषयी आदर बाळगतील. आपणच जर नकारात्मक वागू लागलो तर इतर व्यक्ती असाच नकारात्मक संदेश इतर आणखी लोकांपर्यंत पोहोचवतील. परिणामी आपले काम व आपले क्षेत्र याचे वातावरण गढूळ करण्यास आपण जबाबदार राहू. आपण देशाविषयी, आपल्या रीतीरीवाज, परंपरा यांचेविषयीही अभिमान बाळगायला हवा. इतरांचे ते चांगले आणि आपले वाईट असे काही नसते.
आपल्याला आपल्या मातृभाषेविषयीही अभिमान वाटायला हवा. आपल्याला इंग्रजी येत नसेल तर त्यात कमीपणा वाटण्याचे काहीच कारण नाही. जगाच्या पाठीवर अब्जावधी लोक असे आहेत की, ज्यांना इंग्रजी येत नाही. याउलट आपण आपली मातृभाषा प्रभावीपणे वापरली पाहिजे. आपण स्वदेशी उत्पादने वापरली पाहिजेत. विदेशी खाद्य पदार्थांचा आहारात जास्त समावेश न करता देशी खाद्यपदार्थांचाच जास्त समावेश असावा. आपण आपला स्वाभिमान अशा प्रकारे जर जोपासला तर आपला भारत देश अधिक सक्षम होईलच आणि आपणही अधिक सक्षम होऊ.
आपण आपल्या मनमंदिराच्या गाभाऱ्यात बसून, आपल्या मनोदेवताला आपल्यातील स्वत्वाचे पुष्प अर्पण केले तर प्रसाद स्वरूपात आपलीच आपल्याला नव्याने ओळख होईल. आपण स्वतःला एका नव्या स्वरूपात, नव्या शैलीमध्ये स्वतःला जगापुढे सादर करू यात शंकाच नाही.
अनिकेत भालेराव