मिताली राज हे नाव घराघरांत पोहोचले ते तिच्या क्रिकेटमधील नैपुण्याच्या जोरावर. महिलांच्या क्रिकेटला दुर्लक्षाचे ग्रहण ज्या काळात होते त्याच काळात मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले पाऊल टाकले. तेव्हा ही मुलगी किती यशस्वी ठरेल, असे नाक मुरडणारे समीक्षक घसा ताणून बोलत होते. याच मितालीने या समीक्षकांचे दात त्यांच्याच घशात घातले व 23 वर्षांची सुवर्ण कारकीर्द यशस्वी ठरवत आपल्या आवडत्या खेळाला अलविदा केला.
मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ही घोषणा अपेक्षित असली तरीही चटका लावणारी ठरली, यात शंका नाही. भारताच्या महिला क्रिकेटमधील “सचिन तेंडुलकर’ असे जिचे सार्थ वर्णन केले जायचे त्या मितालीचा इथपर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. आपल्या 23 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत तिने महिला क्रिकेटला लोकप्रिय करण्यात तसेच नव्या खेळाडूंना या खेळाकडे आकर्षित करण्यात जे योगदान दिले ते शब्दात व्यक्त करणे खरोखरच कठीण आहे. मितालीने 232 एकदिवसीय सामन्यांत 7 हजार 805 धावा केल्या.
एकूण कारकिर्दीत तब्बल 10 हजार 868 धावा करणारी ती भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली. तिने 89 टी-20 सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले, तर आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत तिला केवळ 12 कसोटी सामनेच खेळायला मिळाले. कसोटीत द्विशतक फटकावणारी ती भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली. मितालीने टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती आणि मार्चमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाला आलेल्या अपयशानंतर तिने निवृत्तीचेही संकेत दिले होते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरप्रमाणे मितालीनेही तब्बल 6 एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले, हा देखील एक विक्रमच ठरला.
वयाच्या 39 व्या वर्षी मितालीने थांबण्याचा निर्णय घेतला; पण तिच्या सहभागातील संघाला विश्वकरंडक जिंकता आला नाही, हे एक शल्य तिला आयुष्यभर सतावणार हे निश्चित. सचिनला हे समाधान 2011 साली मिळाले मात्र, सातत्याने सरस कामगिरी करूनही 2019 साली मितालीच्या नेतृत्वाखालील महिला संघ या आनंदापासून वंचित राहिला याचे दु:ख चाहत्यांनाही राहणार आहे.
सेकंड इनिंगचे संकेत
मितालीने आपल्या आयुष्यातील 23 वर्षे क्रिकेटला दिली. या कालावधीत तिच्या पदरी यश व निराशा दोन्ही पडले. तिने कोणतीही तक्रार न करता पुष्पवृष्टी आपलीशी केली, तर टीकेचे वारही झेलले. निवृत्तीच्या संदेशात तिने लवकरच एका नवीन गोष्टीला सुरुवात करणार असल्याचे संकेत दिले. तिचा हा प्रवास एक खेळाडू म्हणून संपुष्टात आला असला, तरीही याच खेळाशी भविष्यात जोडलेली राहणार हे तिचे वक्तव्य खूप काही सांगून जात आहे. कदाचित येत्या काळात ती भारतीय महिला संघाची प्रशिक्षक, मेंटॉर किंवा सल्लागार म्हणून कार्यरत झालेली दिसेल, या शंका नाही. केवळ भारतीयच नव्हे तर, जगभरातील महिला क्रिकेटच्या प्रसारासाठी तिची काम करण्याची इच्छा तिच्या सेकंड इनिंगचा दावा घट्ट करत आहे.
धोनी व मितालीबाबत योगायोग
मिताली व भारताच्या पुरूष क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्या निवृत्तीत बराच योगायोग आहे. या दोघांनी भारतीय संघाकडून सर्वाधिक सामने खेळले. धोनीने कर्णधार म्हणून 332 सामन्यांत नेतृत्व केले. मितालीने महिला संघाचे 195 सामन्यांत कर्णधारपद भूषवले. एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत धोनी आणि मिताली यांनी भारतासाठी अखेरचा सामनाही विश्वकरंडक स्पर्धेतच खेळला. या दोन्ही खेळाडूंनी अर्धशतकी खेळी केल्या मात्र, तरीही त्यांच्या संघांना पराभवाचाच सामना करावा लागला. या दोन्ही वेळी भारतीय संघ विश्वकरंडक स्पर्धेच्या विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला. तसेच हे दोन्ही खेळाडू कमनशिबी ठरले, त्यांना निवृत्ती सोशल मीडियावरूनच जाहीर करावी लागली व त्यांना फेअरवेल सामनाही मिळाला नाही. धोनीने 2019 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना इंग्लंडमध्ये खेळला. त्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. मितालीनेही ट्विटरवरूनच निवृत्तीची घोषणा केली. मितालीने न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले व तिच्या नेतृत्वाखालील संघालाही उपांत्य फेरीपूर्वीच बाहेर पडावे लागले.
भरतनाट्यम सोडावे लागले
मिताली राजने अनेकदा सांगितले की, क्रिकेट हे तिचे पहिले प्रेम कधीही नव्हते. तिला नृत्यांगना व्हायचे होते. त्यासाठी लहानपणापासूनच तिने भरतनाट्यमचे धडे गिरवायलाही सुरुवात केली होती. मात्र, तिच्या वडिलांमुळे तिला भरतनाट्यम सोडावे लागले. अवघ्या 10 वर्षांची असताना भरतनाट्यम किंवा क्रिकेट यापैकी एकाची निवड करायची वेळ आली त्यावेळी तिला वडिलांच्या दडपणामुळे क्रिकेटची निवड करावी लागली. एकीकडे क्रिकेटमध्ये दिसत असलेली सुवर्ण कारकीर्द तर दुसरीकडे भरतनाट्यमची आवड यात अडकलेल्या मितालीने अखेर क्रिकेटवरच लक्ष केंद्रित केले व देशाला तिच्या रूपाने भारताच्या महिला क्रिकेटची “अनिभिषिक्त सम्राज्ञी’ मिळाली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
मितालीने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी 1999 साली आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. 3 डिसेंबर 1982 साली राजस्थानच्या जोधपूरमध्ये जन्मलेली मिताली भारतीय महिला क्रिकेट संघाकडून इतकी यशस्वी ठरली की, सचिनप्रमाणे आज ती नवोदित खेळाडूंसाठी आयडॉल बनली आहे. वडिलांच्या हट्टामुळे हातात बॅट घेणारी मिताली जागतिक क्रिकेटमध्ये कित्येक विक्रमांची धनी बनली. भारताचा महिला क्रिकेट संघ 2006 साली पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळण्यासाठी उतरला त्यावेळी कर्णधार मितालीच होती. भारतासाठी पहिली महिला टी-20 कर्णधार ठरण्याचा विक्रम मितालीच्याच नावावर कायम राहिला आहे. तसेच महिला टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याची कामगिरीही पहिल्यांदा मितालीनेच केली. तिने टी-20 सामन्यात दोन हजारांपेक्षाही जास्त धावा केल्या आहेत. मिताली हे नवोदितांसाठी मैलाचा दगड आहे, आता त्याचा पाठलाग करत स्मृती मानधना किंवा हरमनप्रीत कौर यशस्वी होतात का किंवा नवे खेळाडू यात बाजी मारतात, याकडे भारतीय महिला क्रिकेट जगताचे लक्ष राहणार यात शंका नाही.
तिमिरातून तेजाकडे
भारताचेच नव्हे तर इंग्लंड व ऑस्ट्रेलिया वगळता जागतिक क्रिकेटमध्ये महिला क्रिकेटची केवळ टर उडवली जात होती, त्या काळात मितालीचा भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर उदय झाला. त्यावेळी भारताचे महिला क्रिकेट स्वतंत्र संघटनेशी बांधले गेले होते. कालांतराने जसजशी महिला क्रिकेटची लोकप्रियता वाढू लागली तेव्हा काही प्रमाणात महिला क्रिकेटकडे पैसा येऊ लागला. मात्र, त्यालाही खूप मर्यादा होत्या. दौरे फारसे होत नव्हते, पर्यायाने सामने खूप कमी खेळायला मिळत होते. त्यातही परदेश दौरे वगेरे चैन समजली जात होती.
अशाच परिस्थितीत काळ बदलला व महिलांच्या क्रिकेटला बीसीसीआयने आपल्या छत्रछायेखाली घेतले. हा निर्णय महिला क्रिकेटसाठी कलाटणी देणारा ठरला. अगदी पुरुष क्रिकेटपटूंइतके नाही; पण समाधानकारक मानधन महिला खेळाडूंना मिळू लागले व ज्या गोष्टीची अपेक्षा व नितांत गरज होती ते स्थैर्य महिला क्रिकेटपटूंनाही मिळाले. आज जगभरातील सर्व क्रिकेट मंडळात सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ अशी सार्थ ओळख असलेल्या बीसीसीआयने महिलांच्या क्रिकेटसाठी, लोकप्रियता व प्रसारासाठी ज्या काही योजना केल्या त्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. मितालीने निवृत्ती घेतली असली तरीही तिच्या पावलावर पाऊल ठेवत पुढे येत असलेल्या खेळाडूंना रेड कार्पेट मिळत आहे ते मितालीमुळेच. तिने भारतीय महिला क्रिकेटकडे महिला क्रिकेट संघटनांना तसेच जगभरातील क्रिकेट मंडळांना पाहायला लावले हे कोणीही नाकारणार नाही.
भारताच्या महिला क्रिकेटचा प्रवास “तिमिरातून तेजाकडे’ सुरू झाला त्याला कारण मिताली ठरली, हे सगळेच मान्य करतील. असो, ज्या मितालीवर शंका घेतली जात होती व ती कितपत यशस्वी ठरेल असे विचारले जात होते, त्या सर्वांनाच तिने थाटात कारकीर्द घडवत उत्तर दिले आहे व त्याची बोलती बंद केली आहे. भारताच्या महिला क्रिकेटमधील “सचिन तेंडुलकर’ असे संबोधली जात असलेल्या मितालीने निवृत्ती घेतली असली तरीही जेव्हा भारतीय महिला क्रिकेटचा उल्लेख केला जाईल तेव्हा मितालीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाईल यात दुमत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून ती निवृत्त झाली असली तरीही ती सेकंड इनिंगद्वारे याच खेळाशी जोडलेली राहील व ही इनिंगही ती यशस्वी करून दाखवेल, असा विश्वास वाटतो.
अमित डोंगरे