एखाद्या मोठ्या समूहात, कंपनीत मोठी समस्या निर्माण झाली की त्यावर उपाय शोधून काढण्यासाठी ब्रेनस्टॉर्मिंग या पद्धतीचा वापर करतात हे कदाचित ऐकिवात असेल. यालाच मी मराठीत “मस्तिष्कक्षोभ’ अशी संज्ञा दिली आहे. व्यक्तित्त्वभिन्नतेमुळे प्रत्येक व्यक्तीची बुद्धिमत्तेची पातळी, समस्येचं निराकरण करण्याची क्षमता अर्थातच वेगवेगळी असते. अल्बर्ट आइनस्टाइनसारखी बुद्धिमत्ता सामान्य माणसाच्या अंगी असणे अशक्यच. अशा परिस्थितीत एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल, एखाद्या प्रश्नाची उकल करायची असेल तर विविध व्यक्तींच्या सामूहिक बुद्धिमत्तेचा आणि क्षमतेचा वापर केला जातो. यालाच ब्रेनस्टॉर्मिंग किंवा मस्तिष्कक्षोभ म्हटलं जातं.
इंग्रजीत एक म्हण आहे- टू हेड्स आर बेटर दॅन वन. याचा अर्थ असा की एकट्यानं जे शक्य होत नसेल ते अन्य व्यक्तींमुळे होऊ शकतं. हिंदीमध्ये याच अर्थाचा “एक से भले दो’ असा वाक्प्रचार आहे. हेच तत्त्व मस्तिष्कक्षोभ प्रणालीत वापरलं जातं. या पद्धतीचा वापर कसा करायचा याची काही तंत्रं आहेत. जी माणसं आपल्या मेंदूला ताण देऊन कल्पनानिर्मिती करणार आहेत त्यांना काही काळ आधीपासून सूचना देणं आवश्यक आहे. किती व्यक्तींचा समूह कल्पनानिर्मिती करणार आहे याचा बारकाईनं विचार व्हायला हवा. साधारणत: 3 व्यक्तींपेक्षा लहान आणि 10 व्यक्तींपेक्षा मोठा गट नसावा. गट मोठा असल्यास मंडईसारखा गोंधळ होण्याची शक्यता असते, तर दोन व्यक्ती असल्यास भांडणं होण्याची संभावना असते.
ज्या ठिकाणी मस्तिष्कक्षोभ करावयाचा असेल तिथे शांतता तसंच कल्पनानिर्मितीसाठी पोषक वातावरण असायला हवं. यामुळे नवनवीन कल्पना सुचण्यास मदत होते. गटातील सर्व व्यक्तींना कल्पना मांडण्यास प्रोत्साहन देणं आवश्यक असतं. कुठल्याही कल्पनेचं अथवा विचाराचं परीक्षण पूर्णत: टाळलं पाहिजे. कल्पनांचा विच्छेद त्या सभेतच होऊ लागला तर नव्या विचारांचा स्रोत नक्कीच आटेल. जितक्या जास्त कल्पना किंवा विचार प्रकट होतील तितकं त्या मस्तिष्कक्षोभाचं यश म्हणता येईल. एका व्यक्तीनं सर्व कल्पनांची नोंद ठेवली पाहिजे. अर्थात त्या व्यक्तीलाही आपल्या कल्पना मांडण्याची मुभा असली पाहिजे. कित्येकदा असं होतं की, एखाद्या व्यक्तीच्या कल्पनेत दुसरी व्यक्ती भर घालू शकते किंवा त्यात सुधारणा करणारा विचार मांडू शकते. याला एका कल्पनेच्या पाठी दुसरी कल्पना (पिगीबॅकिंग) असं म्हणतात.
मस्तिष्कक्षोभ करणाऱ्या समूहामध्ये विषयाशी निगडित तसंच त्या विषयाची इत्थंभूत माहिती असलेले लोक तर हवेतच पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे विषयाचं फारसं ज्ञान नसलेले लोकही समूहात असले पाहिजेत. एका कंपनीमध्ये अतिशय महत्त्वाच्या तांत्रिक गोष्टीवर मस्तिष्कक्षोभ करण्याचं ठरलं. मस्तिष्कक्षोभातील तज्ज्ञ अधिकाऱ्यानं कंपनीतील वॉचमन तसंच माळी यांनाही समूहात सामावून घेतलं. आश्चर्य म्हणजे त्या दोघांनीही काही उपयुक्त कल्पना दिल्या.
सामान्य माणसंही कशा अतिशय महत्त्वाच्या कल्पना देऊ शकतात याचं एक उदाहरण म्हणजे खूप उंचीपर्यंत माल भरलेला एक ट्रक एका छोट्या बोगद्यापाशी अडकला होता कारण त्या बोगद्याची उंची केवळ काही इंचांनी छोटी होती. कुणालाही काही सुचेना. एक चुणचुणीत मुलगा पुढे आला आणि त्यानं ट्रकच्या टायर्समधील हवा काही अंशानं कमी केली. आता बोगद्यातून ट्रक विनाअडथळा जाऊ शकत होता. अशाच एका दुसऱ्या उदाहरणात एक खूप अवजड यंत्र एका खड्ड्यामध्ये बसवावयाचं होतं. यंत्र सरळ जमिनीवर सरकवता येत होतं पण खड्ड्यात कसं बसवणार? एका चलाख कामगारानंच सुचवलं की खड्ड्यात बर्फाच्या लाद्या टाकून त्या पृष्ठभागापर्यंत येतील असं करायचं. मग यंत्र सरकवून बर्फाच्या लाद्यांवर आणायचं. बर्फ वितळेल तेव्हा यंत्र आपोआप खड्ड्यात जाऊन बसेल. काही सामान्य वाटणाऱ्या लोकांमध्येही समस्यापूर्तीची क्षमता असते, हे लक्षात ठेवलं पाहिजे.
अनेक कंपन्यांमध्ये मस्तिष्कक्षोभाचा वापर समस्येचं निराकरण करण्याकरता केला जातो. मीही माझ्या कार्यकाळात केला आहे आणि उत्तम परिणाम मिळालेले आहेत. असं सांगतात की, अमेरिकन राष्ट्रपती ओबामा यांची ओसामा बिन लादेनला ठार मारण्याची योजना असो अथवा आपल्याकडील बालाकोट तसंच सर्जिकल स्ट्राइक या योजना असोत-मस्तिष्कक्षोभाच्या वापरामुळेच त्या यशस्वी झाल्या आहेत.
– श्रीनिवास शारंगपाणी