माध्यम म्हणजे दोन किंवा अनेक सजीवांमध्ये संवाद साधण्यासाठी असलेले साधन. इंग्रजीत आपण याला मीडियम म्हणतो- अनेकवचन मीडिया. सजीवांमध्ये अशा करता म्हटलं आहे कारण बहुतांश जीव कुठल्या ना कुठल्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असतात. मुंग्या एकमेकींशी तोंडातील विशिष्ट रसायनांच्या साह्यानं संवाद साधतात. वनस्पतीही विशिष्ट रसायनं वापरून फक्त एकमेकांशीच नव्हे तर काही बुरशींमार्फत सूक्ष्म जीवांशी संपर्क साधतात असं आढळून आलं आहे.
काही वनस्पती विद्युत-संकेताद्वारे (इलेक्ट्रिक सिग्नल) बोलतात, असं संशोधनातून निष्पन्न झालं आहे. जगण्यासाठी आणि समाजात राहण्यासाठी संपर्कमाध्यमं आवश्यक आहेत. मानव जेव्हा अप्रगत होता, गुहेत राहून शिकार करून आपलं आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता तेव्हा तो खाणाखुणांच्या साह्यानं संवाद साधत होता. या स्थितीतून उत्क्रांत झाला तेव्हा बोलीभाषा निर्माण झाली. ती केवळ खाणाखुणांना पूरक होती. समजा, “अ’ हा रानटी माणूस “ब’शी संपर्क साधू इच्छित आहे. “अ’ खाणाखुणा करीत आहे परंतु “ब’ दूर आहे किंवा त्याचं लक्ष नाही. अशा वेळेला त्याचं लक्ष वेधून घेण्याकरता “अ’ एक आवाज काढतो. यातूनच बोली भाषेची निर्मिती झाली.
फक्त “ब’लाच बोलवायचं असेल आणि “क’, “ड’ यांना नसेल तर “अ’ एक विशिष्ट आवाज काढतो ज्यामुळे “ब’ला कळतं की केवळ आपल्याला बोलावलं जात आहे. अशा परिस्थितीतून माणसांना “नाव’ देण्याची पद्धत निघाली असावी. जेव्हा एका पिढीतून दुसऱ्या पिढीला संदेश द्यायचा असेल तर बोली भाषेचा काय उपयोग? अरण्यातील एखाद्या भागात खूप हरिणं आहेत किंवा उन्हाळ्याच्या दिवसात चविष्ट फळं उपलब्ध होतात हे ज्ञान असलेला वृद्ध रानटी माणूस पुढील पिढीला हे ज्ञान देण्यासाठी गुहेमध्ये भित्तिचित्र काढील. खूप हरिणं असतील अशा भागात कसं जायचं त्याचा नकाशा असेल.
खूप फळांनी लगडलेले वृक्ष असतील आणि आकाशात सूर्य दाखवलेला असेल जेणेकरून उन्हाळ्यात ती फळं उपलब्ध होतात असं सुचवलं जाईल. यातून प्रथम चित्रलिपी आणि नंतर अक्षरलिपी निर्माण झाली. मनुष्य प्रवास करू लागला आणि दूरवरच्या भूभागात स्थायिक होऊ लागला तेव्हा त्याला लांबवरच्या इतर माणसांशी संपर्क करण्याची इच्छा झाली. मग प्रथम दळणवळण सुरू झालं. जेव्हा प्रत्यक्ष भेट देणं शक्य नसेल तेव्हा पत्र पाठवण्याची क्लृप्ती त्याला सुचली. विशिष्ट स्तंभ उभारून तेथील सेवक पत्रावरील पत्त्यानुसार पुढील स्तंभाकडे पोहोचवीत. तिथून पुढील स्तंभाकडे अशा रीतीने पत्राचा प्रवास इष्टस्थळापर्यंत होत असे.
स्तंभाला इंग्रजीत “पोस्ट’ असा शब्द आहे. यावरूनच टपालखात्याला “पोस्ट’ असं नाव पडलं. माणसाची वैज्ञानिक प्रगती होत गेली. प्रथम तारायंत्र, नंतर दूरध्वनी अशी संपर्कमाध्यमं विकसित होत गेली. आजचा भ्रमणध्वनी हा दूरध्वनीचाच वंशज आहे. लिखित साहित्य दूरवर पोहोचवण्यामध्ये मुद्रणकलेचा विकास हा मैलाचा दगड मानावा लागेल. मुद्रणकलेनं वृत्तपत्रं, ग्रंथ या माध्यमांतून विचार सर्वदूर व अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम केलं. चित्रपटांनी कथानकं दृश्यपटलावर (फिल्म) मुद्रित करून कुठेही दाखवण्याची सोय करून दिली.
नभोवाणी (रेडिओ) भाषणं, नभोनाट्यं, क्रीडेचं धावतं समालोचन इत्यादी तत्काळ सातासमुद्रापार पोहोचवू लागली. नंतर तीही उत्क्रांत होऊन दूरचित्रवाणी (टेलिव्हिजन) या माध्यमातून आता नाट्य, चित्रपट, क्रीडा तसंच घटना जशा घडत आहेत तशा जगभरातील प्रेक्षक प्रत्यक्ष पाहू शकतात. आता तर स्मार्टफोनमुळे हे सर्व हातातल्या उपकरणातून आपण पाहू शकतो.
जशी माध्यमं अतिसुलभ होऊ लागली तसं त्याचा गैरवापर बोकाळत असताना आपण पाहात आहोत. कुणालाही व्हिडिओ करून तो जगात इतर जनांना तत्काळ पाठवता येत असल्यानं माध्यमांचा सुकाळ म्हणण्यापेक्षा अतिरेक झालेला आहे. एक मात्र खरं की नवीन माध्यमांमुळे जुनी माध्यमं नष्ट होतील की काय अशी भीती होती. ती खोटी ठरली आहे. रेडिओ, पुस्तकं, टीव्ही, वृत्तपत्रं ही सगळी गुण्यागोविंदानं नांदत आहेत. वापरामध्ये थोडाफार फरक नक्कीच झाला असणार परंतु ही सर्व माध्यमं तगली आहेत. सध्या अमेरिकेत तर ग्रामोफोन रेकॉर्डस् पुनरागमन करताहेत! 5 जी तंत्रज्ञानामुळे प्रत्यक्षानुभवाचं नवं माध्यम लवकरच आपल्या भेटीला येतंय!
– श्रीनिवास शारंगपाणी