ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर जगभरातून आलेले शोक संदेश पाहता ब्रिटनच्या साम्राज्याचा सूर्य हा अजूनही मावळलेला नाही, असे दिसून येते. अर्थात यामागचे प्रमुख कारण म्हणजे एलिझाबेथ द्वितीय यांनी केलेले कार्य. एकीकडे जगभरात ब्रिटनची पत घसरत असताना एलिझाबेथ द्वितीय यांनी सात दशके समर्थपणे गादी सांभाळली.
अठराव्या-एकोणिसाव्या शतकात जगाच्या कानाकोपऱ्यात बहुतांश देशांवर ब्रिटिशांचे साम्राज्य प्रस्थापित झाले होते. त्यांचे शासन असलेल्या देशांत चोवीस तासांत कोठे ना कोठे सूर्य उगवत होता. त्यामुळेच ब्रिटिश साम्राज्याच्या बाबतीत असे म्हटले जाते, की त्यांच्या साम्राज्याचा सूर्य कधीही मावळत नव्हता. ब्रिटिश साम्राज्यांवर जुलमी अत्याचार, लूटमार, अन्याय, भेदभाव यासारखे अनेक आरोप केले गेले. ब्रिटिश शासकांविरुद्ध आंदोलने पुकारली गेली. स्वातंत्र्यलढे उभारले गेले.
त्याची परिणती म्हणजे एक एक देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होत गेले.
आजघडीला हे साम्राज्य केवळ एका देशापुरतेच मर्यादित राहिले आहे. एवढे घडूनही ब्रिटनच्या राजास किमान चौदा देशांत राजा म्हणून सन्मान दिला जातो. यात ऑस्ट्रेलिया, कॅनडाचा समावेश आहे. याशिवाय ब्रिटिशांनी राज्य केलेल्या देशांच्या राष्ट्रकुल संघटनेचे नेतृत्वही ब्रिटनच करते. एका अर्थाने आजही ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य मावळलेला नाही, असेच म्हणावे लागेल.
ब्रिटिश साम्राज्याचा आणि शासनकर्त्यांचा दरारा, थाटमाट, डामडौल जगातील बहुतांशी देशांनी पाहिला आणि अनुभवला. एकीकडे गरिबी आणि दुसरीकडे इंग्रजांचे पुरविण्यात येणारे लाडही पाहिले. असे असतानाही आजही त्यांच्याबाबतीत सन्मान आणि आदराची भावना दिसून येते. अर्थात असा रुबाब अन्य देशांच्या राजांचा दिसला नाही आणि आताही दिसून येत नाही. जगभरात नेदरलॅंड, स्पेन, बेल्जियम आदी देशांनी अन्य देशांवर राज्य केले, परंतु त्यांच्या शासकांप्रती ब्रिटिशांच्या तुलनेत कोठेच सन्मान दिसून येत नाही.
राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ही बाब प्रकर्षाने दिसून आली. ज्या देशांनी ब्रिटिशांना पिटाळून लावण्यासाठी संघर्ष केला, बलिदान दिले, ते देश देखील राणींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहेत. यामागचे कारण म्हणजे ब्रिटिश साम्राज्यांनी लयलूट केली असली तरी दुसऱ्या हाताने स्थानिक पातळीवर कामही केले. मंगोल, तुर्क, पर्शियन आदी देखील परकीय आक्रमणकर्ते शासक होऊन गेले आहेत. परंतु त्यांचा आदर करणे तर दूरच, पण त्यांची आठवणही कोणी काढत नाही.
जगभरात आजही कोठे ना कोठे राजेशाही सुरू आहे, पण ती नावापुरतीच आहे. खऱ्या अर्थाने देशाचा कारभार हा लोकशाही मार्गाने जनतेने निवडून दिलेल्या सरकारच्या माध्यमातून चालतो. ज्या देशात राजेशाही आहे, तेथे एक आदर आणि परंपरा म्हणून ती टिकवून ठेवली आहे. काही अरब देशांत अशा प्रकारची व्यवस्था असून तेथे सर्व अधिकार हे राजाच्या हाती आहेत. ब्रिटनप्रमाणेच बेल्जियम, स्पेन, डेन्मार्क, जपान, लक्झेमबर्ग, नेदरलॅंड, नॉर्वे, मलेशिया, थायलंड, मोनॅको, भूतान, कंबोडियासारख्या देशात राजेशाही सुरू आहे, पण या देशांमध्येही राजेशाहीच्या बरोबरीने लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले सरकार देखील आहे. मात्र, तरीही राजा किंवा राणीला सन्मान दिला जातो. नॉर्वेत 872 पासून हराल्ड फेअरहेयर राजघराण्याची सत्ता आहे. स्पेनमध्ये दहाव्या शतकांपासून राजेशाही आहे. जपानचा विचार केल्यास सहाव्या शतकापासून सम्राट किनमेई यांची राजवट असल्याचे पुरावे सापडतात. स्पॅनिश साम्राज्य किंवा हिस्पॅनिक राजेशाही किंवा कॅथोलिक राजेशाही तर जगात ब्रिटननंतरची सर्वात मोठी राजेशाही म्हणून ओळखली जाते.
1492 ते 1976 यादरम्यान इतिहासात सर्वात मोठे साम्राज्य असणाऱ्यांपैकी स्पेनच्या राजवटीने अमेरिकेचा मोठा भाग, पश्चिम युरोप, आफ्रिका आणि ओशिनिया, आशिया खंडातील विविध बेटांवर अधिपत्य गाजविले. ही राजवट आधुनिक काळाच्या सुरुवातीस शक्तिशाली मानली गेली. एकप्रकारे ती ब्रिटिश राजवटीप्रमाणेच ओळखली जायची. त्यांचाही सूर्य कधीही मावळत नव्हता. स्पेन साम्राज्याचा परिणाम म्हणजे आज अनेक देशात मूळ भाषा ही स्पॅनिश असून त्यांची स्थानिक भाषा काळाच्या पडद्याआड गेली, पण ब्रिटिश साम्राज्याला मिळणारा बहुमान हा स्पेनच्या शासकांना मिळत नाही. म्हणजेच हुकूमत गाजविण्यासाठी केवळ शासन करणे पुरेसे नाही तर जनतेच्या मनात, पिढ्यान्पिढ्या स्मरणात राहील असे काम करणे हे देखील महत्त्वाचे आहे. बेल्जियम आणि जर्मनीने आफ्रिकेच्या मोठ्या भागावर शासन केले, परंतु त्यांची आज कोणीही आठवण काढत नाही. ब्रिटिश शासक त्याला अपवाद ठरले.
आज राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे, यावरून ब्रिटिश शासनकर्त्यांचा सूर्य अजून मावळलेला नाही, हे सिद्ध होते. यामागचे विशेष कारण म्हणजे राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे कार्य. एकीकडे जगात ब्रिटनची पत घसरत असताना आणि प्रचंड राजकीय उलथापालथी घडत असताना राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी सात दशकं गादी सांभाळली. वाचन केल्याशिवाय भाषण देऊ शकत नाही, असे टोमणे तत्कालीन टीकाकारांनी राणी एलिझाबेथ यांना मारले होते. त्या शाळेत जरी गेल्या नसल्या तरी त्यांना अनेक भाषा अवगत होत्या.
एलिझाबेथ यांच्या सत्तारोहणाच्या कार्यक्रमाचे प्रसारण जगभरात टीव्हीवर करण्यात आले. तत्कालीन पंतप्रधान विस्टन चर्चिल यांनी हा वायफळ खर्च असल्याची टीका केली होती. सुवेझ कालवा वादाच्या वेळी इजिप्तने ब्रिटनचा अपमान केला होता. सुवेझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. परिणामी ब्रिटनच्या फौजांना रिकाम्या हाताने परतावे लागले. एलिझाबेथ द्वितीय यांनी राजेशाहीच्या जागी शाही हा शब्द वापरण्यावर भर दिला. आफ्रिका देशांशी संबंध सुरळीत राहण्यासाठी आणि वर्णद्वेष मिटविण्यासाठी एलिझाबेथ यांनी प्रयत्न केले; परंतु त्यांच्याच पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी पाठिंबा दिला नाही.
आयरिश रिपब्लिकन आर्मीने त्यांचे चुलतबंधू लॉर्ड माउंटबेटन यांची हत्या केली; परंतु एलिझाबेथ यांनी आर्मीचे नेते मार्टिन मॅक्गिनसशी मैत्रीचा हात पुढे केला. आयरिश लोकांवर ब्रिटनने केलेल्या अत्याचारबद्दल एलिझाबेथ यांनी खेद व्यक्त केला. त्यांनी शाही कुटुंबास सामान्य लोकांना भेटण्याची परंपरा सुरू केली. ब्रिटनपासून स्कॉटलंड वेगळे होण्याची तयारी करत असताना एलिझाबेथ यांनी नागरिकांना भावनिक आवाहन करत विचारपूर्वक निर्णय घेण्याचे सांगितले. यामुळे स्कॉटलंडला पुरेसा पाठिंबा मिळाला नाही. यावरून राणीचा प्रभाव लक्षात येतो. अमेरिकी कॉंग्रेसमध्ये बोलणाऱ्या त्या पहिल्या राणी होत्या. अशा अनेक अंगांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व उजवे ठरते.
– योगेश मिश्र