श्रीकांत कात्रे
आवड असली की सवड मिळते, असे नेहमी म्हणतात. पण फक्त आवड असून चालत नाही. त्या आवडीचे रुपांतर व्यवसायात करण्यासाठी मनात इच्छाशक्ती असावी लागते. सविता जाधव यांना फराळाचे पदार्थ तयार करण्याची आवड होती. पण आपल्याबरोबर इतर जवळच्या महिलांनाही कष्ट करून त्यांच्या गाठीला दोन पैसे बांधता यावेत, या विचारातून त्यांनी आवडीचे रुपांतर व्यवसायात केले. पुढे मसाले तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यामुळे व्यवसायाला दिशा तर मिळालीच, शिवाय इतर महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या.
कोल्हापूरपासून पाच किलोमीटरवरील शिंगणापूर गावातील सविता जाधव यांनी आज आपली स्वतःची एक आगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे शिक्षण बी. ए. पर्यंत झाले आहे. पतीही ऑडिटर आहेत. त्यामुळे आर्थिक गरज म्हणून त्यांना काही धडपडण्याची आवश्यकता नव्हती. मात्र, चकलीसह विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ तयार करण्याची आवड त्यांना जपायची होती. त्यांचे माहेर पिशवी (ता. मलकापूर). पण आता त्यांची आईही शिंगणापूरला राहते.
खरे तरं त्यांच्या आईकडून त्यांना असे चविष्ट पदार्थ तयार करण्याची हातोटी गवसली. त्यांच्या हाताला चव होती. त्यामुळे त्यांनी तयार केलेले पदार्थ सर्वांना आवडायचे. पैसे कमविण्याची गरज असणे ही गोष्ट वेगळी असते. पण आवड जपण्यासाठी प्रयत्न करताना सविता यांनी आजूबाजूच्या महिलांना रोजगार मिळावा, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून व्यवसाय करण्याचे ठरविले. हा विचार त्यांनी आपल्या पतींना सांगताच त्यांनीही त्याला पाठिंबा दिला. सुरवातीला त्यांनी एकटीनेच चकल्या तयार करून द्यायला सुरवात केली. जशा घरगुती स्वरूपात ऑर्डर्स मिळतील तसे काम सुरू केले. तोंडी प्रसिद्धी होऊ लागली. चकलीबरोबरच लाडू, शंकरपाळी, बाकरवडी अशा इतर पदार्थांसाठी हळूहळू ऑर्डर्सचे प्रमाण वाढू लागले. रवा, बेसन, बुंदी डिंक असे विविध प्रकारचे लाडू त्या तयार करतात. मग इतर महिलांना काम देता येऊ लागले. आता त्यांचा हा व्यवसाय बाराही महिने सुरू असतो. सुरवातीला त्यांच्या मदतीला नेहमीच्या चार महिला होत्या. आता सणासुदीच्या हंगामात 17 ते 18 महिला त्यांच्याकडे काम करतात.
असा व्यवसाय वाढत असताना लॉकडाऊनच्या काळात माणदेशी फाउंडेशनची व्हॅन त्यांच्या गावात आली होती. या व्हॅनमधून महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत होते. त्यात शिवणाचाही समावेश होता. सविता यांना पूर्वीपासूनच शिवणकाम येत होते. फराळ तयार करण्याबरोबरच शिवणकामही त्यांनी परत सुरू केले.
पण खाद्यपदार्थाच्या जोडीला मसाल्याचा व्यवसाय असावा, असे त्यांना वाटले. माणदेशी फाउंडेशनकडून त्यांनी मसाले तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. फराळाचे पदार्थ तयार करताना आठवड्यातील चार- पाच दिवस महिलांना काम मिळायचे पण इतर वेळी महिलांना इतरत्र काम शोधावे लागायचे, हे लक्षात घेऊन सविता यांनी मसाल्याचे काम सुरू केले तर या महिलांना रोजच काम देता येईल, असा विचारही केला होता. फराळाचे पदार्थ तयार करणे, शिवणकाम आणि आता मसाले तयार करणे अशी व्यवसायाची व्याप्ती वाढत चालली होती. माणदेशी फाउंडेशनच्या कार्यशाळा व इतर कार्यक्रमांतून खूप माहिती मिळू लागली. व्हॉटस ऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा डीजिटल प्लॅटफॉर्मद्वारे व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत पोहचविणे, अकाउंटस, बॅंकिंग व्यवहार, शासकीय कागदपत्रांची पूर्तता अशा गोष्टी माणदेशीमुळे समजत गेल्या.
ऑनलाइन माहिती ग्राहकांना मिळू लागल्याने व्यवसाय वाढत गेला. फराळाच्या पदार्थांना मागणी वाढली. काही बेकरींमधून चकलीसारखा पदार्थ विक्री होऊ लागला. बिर्याणी मसाला, चिकन मसाला, पनीर टिक्का मसाला, तंदुरी मसाला, कोल्हापूरी गरम मसाला, सांबार मसाला, मटण मसाला असे 16 प्रकारचे मसाले त्या तयार करतात. सध्या काही दुकानांतून तसेच किरकोळ स्वरूपातील विक्री होते. स्वयम सिद्धी या ब्रॅंन्डने मसाले व खाद्यपदार्थ आता विकले जाऊ लागले आहेत. या व्यवसायत त्यांना अजूनही वाढ करायची आहे. सध्या कोल्हापूरातील माणदेशीच्या कार्यालयातील मशीनवरून त्या मसाल्याचे उत्पादन घेतात. आता त्यांना मसाले तयार करण्यासाठी स्वतःची मशिनरी घ्यायची आहे.
जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिब्युटर्स नेमायचे आहेत. व्यवसाय वाढल्याने आणखी काही महिलांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असा दृष्टीकोन मनाशी बाळगत त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. स्वतःची आवड जपण्याबरोबरच आजूबाजूच्या महिलांचा विचार करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी संवेदनशील मन असावे लागते. इतरांप्रति असलेली संवेदना जागी असणे महत्त्वाचे असते. असा विचार महिलाच करू शकते. सविता जाधव यांनी इतर महिलांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांच्या स्वावलंबनासाठी टाकलेले पाऊल अनुकरणीयही आहे.