भारताच्या महिला संघाला यंदा न्यूझीलंडमध्ये झालेल्या महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत साफ अपयश आले. संघाला साखळीतून उपांत्य फेरीतही प्रवेश करता आला नाही. अनुभवी कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वाखालील संघ संभाव्य विजेता वगैरे मानला जात होता. मात्र, प्रत्यक्षात महत्त्वाच्या सामन्यांतच खेळाडूंनी हाराकीरी पत्करली व साखळीतच आव्हान संपल्यावर मायदेशी प्रयाण केले. ज्या महिला क्रिकेट संघाकडे अफाट गुणवत्ता आहे त्यांनीच अपेक्षाभंग केला. आता पुढील मोसमापूर्वी संघातील खेळाडूंना एकत्र येत झालेल्या चुकांमधून काय शिकता येईल व संघ पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर कशी वाटचाल करेल यावर गांभीर्याने मार्ग काढावा लागणार आहे.
यंदाच्या स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी भारतीय महिला संघाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. स्पर्धेची सलामी देखील संघाने थाटात केली व परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला. या सामन्यापासून विजयी घोडदौड सुरू होईल अशी खात्रीही होती. मात्र, संघाने एका सामन्यात विजय तर दुसऱ्या सामन्यात पराभव असा खेळ करत चाहत्यांचा हिरमोड केला. आता पराभवानंतर ब्लेम गेमही सुरू झाला आहे. कर्णधार मिताली राजने तर स्पर्धेदरम्यानच सहकारी खेळाडूंवर टीका करत संघाचे मनोबल खच्ची केले.
खरेतर इतक्या अनुभवी खेळाडूने स्पर्धा सुरू असताना अशी वक्तव्य करणे योग्य नव्हते पण तिला सांगणार कोण? बीसीसीआयचे वरिष्ठ पदाधिकारी तर “आयपीएलच्या कोंबडीकडून सोन्याची अंडी’ गोळा करण्यात व्यस्त होते. महिलांची आयपीएल सुरू करणार, चॅलेंजर स्पर्धाही खेळवली जाणार अशा वल्गनाही केल्या गेल्या मात्र, न्यूझीलंडमध्ये विश्वकरंडक खेळत असलेला महिला संघ कशी कामगिरी करत आहे व प्रशिक्षक तसेच सपोर्ट स्टाफ त्यांच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी काय करत आहेत, ते पाहण्याचे कष्टही कोणी घेतले नाहीत. माजी कर्णधार हरमनप्रीत कौर सुरुवातीला काहीशी अपयशी ठरल्यावर आपल्या महिला संघाच्या काही महान खेळाडूंनी गळा काढायला सुरुवातही केली होती.
हरमनसह संघातील वरिष्ठ खेळाडूंना आता नारळ देण्याची वेळ आली आहे वगैरे टीकाही सुरू झाल्या. त्याच हरमनने त्यांचेच दात घशात घालत अफलातून खेळी केल्या. स्टार फलंदाज स्मृती मानधनाही भरात आली फक्त फरक हाच की महत्त्वाच्या सामन्यांत आपल्या गोलंदाजांनी प्रचंड चुका केल्या व त्याचाच फटका संघाला बसला. राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा, अनुभवी झुलन गोस्वामी, स्नेह राणा, पुजा वस्त्रकार व पार्टटाइम गोलंदाज हरमनप्रीत या गोलंदाजांना संमिश्र यश मिळाले. झुलनने सर्वाधिक सामने खेळणारी पहिली भारतीय गोलंदाज, सर्वाधिक बळी घेणारी पहिलीच गोलंदाज अशी ख्याती मिळवली; पण महत्त्वाच्या लढतींतच तिला बळी घेता आले नाहीत; मग ही स्पर्धा जिंकणार कोणाच्या जीवावर?
प्रमुख फलंदाज काय करत होते?
स्मृती मानधना, मिताली राज, हरमनप्रीत यांच्यासह संघातील सर्वच प्रमुख फलंदाज चांगली खेळी करत होते; पण त्यात सातत्य नव्हते. न्यूझीलंडच्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठीच तर हा संघ स्पर्धेपूर्वी मालिका खेळण्यासाठी रवाना झाला होता. पण त्यातून काय हाती लागले याचा विचार केला तर बेरीज शून्यच येते. या स्पर्धेतील अखेरच्या सामन्यात अनुभवी झुलन गोस्वामीला वगळले त्याचाही संघाला मोठा फटका बसला. ती तंदुरुस्त होती की नाही, यावर आता चर्चाही रंगायला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत सलामीला पाकिस्तानला हरवले. त्यानंतर यजमान न्यूझीलंडकडून हरलो.
मग पुन्हा वेस्ट इंडीजविरुद्ध जिंकलो आणि इंग्लंडकडून हरलो. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही आपण पराभव पत्करला. यावेळी या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी आपल्याला बांगलादेश व दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध विजय मिळवणे अनिवार्य बनले होते. त्या दिशेने सुरुवात करताना भारतीय संघाने बांगलादेशला पराभूत करत आशा दाखवली. त्यावेळी दक्षिण आफ्रिका संघाचा एकमेव अडथळा आपल्यासमोर होता.
महत्त्वाच्या सामन्यात हाराकिरी
साखळी स्पर्धेतील अखेरचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होता व हा सामना जिंकला तर उपांत्य फेरीत प्रवेशही मिळणार होता. त्यात सुरुवातही थाटात झाली. स्मृती मानधना, मिताली राज, शेफाली वर्मा यांनी अर्धशतके फटकावली. हरमनने उपयुक्त खेळी केली व संघाने तब्बल 274 धावा फलकावर लावल्या. आता भारताच्या फिरकी गोलंदाजीची ताकद इतकी होती की भल्या भल्या फलंदाजांना आपण जेरीस आणले होते. याच सामन्यात मात्र, भारतीय गोलंदाजीला लॉ ऑफ ऍव्हरेजेसचा फटका बसला. इतक्या मोठ्या धावसंख्येचा बचावही करता आला नाही त्याचेच शल्य वाटते.
इथे ऑस्ट्रेलियाचा संघ असता तर या धावा त्यांनी एव्हरेस्ट इतक्या मोठ्या ठरवल्या असत्या. मात्र, भारताच्या गोलंदाजांना दक्षिण आफ्रिकेवर दडपणही टाकता आले नाही. हा सामना अत्यंत रंगतदार झाला मात्र, त्यात मितालीने दीप्ती शर्माकडे चेंडू सोपवला आणि सामन्याचे चित्र पालटले. तिच्या एका चुकीमुळे हातात आलेला सामना आपण गमावला. या अखेरच्या षटकात अखेरच्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेला 3 धावांची गरज होती. दीप्तीने हा चेंडू नोबॉल टाकला. त्यावर एक अतिरिक्त धाव तर मिळालीच पण एक जादा चेंडूही त्यांना मिळाला व त्यांचा विजय साकार झाला आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत दाखल झाली.
स्लॉग ओव्हर्समध्ये कशी गोलंदाजी करायची असते याबाबत दीप्तीला मितालीने काहीही सांगितले नसावे असे वाटण्याइतपत तिने गोलंदाजी केली. भारताच्या महिला संघाची ताकद वेगवान गोलंदाजीत नाही हे ओळखूनच मितालीने दीप्तीकडे चेंडू सोपवला होता. मात्र, त्यापूर्वी तिने माजी कर्णधार हरमनशी तसेच स्मृती मानधनाशी चर्चाच केली नाही. कदाचित या दोघींनी दीप्तीच्या जागी पूजा वस्त्रकार किंवा मेघना सिंग या मध्यमगती गोलंदाजाला चेंडू सोपवण्याचा सल्ला दिला असता. अर्थात क्रिकेटमध्ये जर-तर या शब्दाला काहीही किंमत नसते. पण परिस्थिती पाहून निर्णय घेणे तर हातात होते ना व तिथेच मिताली कमी पडली. केवळ पत्रकार परिषदेत स्वतःचे अपयश झाकून अन्य फलंदाजांवर खापर फोडण्याला हिंमत लागत नाही. पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारण्याची धमक लागते व ती मितालीने दाखवली नाही, हेच खरे.
आता तरी आयपीएलचे महत्त्व ओळखा
एकदिवसीय तसेच टी-20 सामन्यांच्या स्पर्धांमध्ये आक्रमक फलंदाजी करणारे किंवा अचूक गोलंदाजी करणारे खेळाडू महत्त्वाचे ठरतात. पुरुषांप्रमाणे महिलांच्याही आयपीएलला लवकरात लवकर प्रारंभ करावा असे सातत्याने बोलले जात होते ते का व कशासाठी, ते आता तरी बीसीसीआयने ओळखले पाहिजे. ज्या आयपीएल स्पर्धेतून भारताच्या पुरुष संघाला मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठीचे स्पेशालिस्ट खेळाडू गवसले तसेच महिलांच्या आयपीएल
स्पर्धेतूनही मिळतील. सध्याच्या भारतीय महिला संघाकडे पाहिले तर असे लक्षात येते की, संघाचा संपूर्ण भार केवळ मानधना, हरमन, झुलन, मिताली, शेफाली व स्नेह राणा यांच्यावरच होता. त्यांना तोलामोलाची साथ देण्यात अनेक खेळाडू कमी पडल्या. जर काही वर्षांपूर्वी घोषणा केलेली महिलांची परिपूर्ण आयपीएल स्पर्धा सुरू झाली असती तर या स्पर्धेत वेगळे चित्र दिसले असते यात शंका नाही. या स्पर्धेच्या अंतिम लढतीत पूनम यादव, तानिया भाटीया व रेणुका सिंग यांना खेळवले गेले नाही. पण त्यांच्या संख्येवरून असे जाणवले की भारतीय महिला संघाकडे बलाढ्य सेकंड बेंचच नव्हता मग रोटेशन करायला खेळाडूंचे पर्याय तरी कुठे होते. यातूनच एक गोष्ट समोर येते की पर्यायी व अफलातून गुणवत्तेचा सेकंड बेंच हवा असेल तर महिलांच्या आयपीएल, चॅलंजर यांसह विविध स्पर्धा व त्यांची संख्या वाढवली गेली पाहिजे. यातूनच असा सेकंड बेंच मिळेल व अशा मोठ्या स्पर्धांमध्ये आंधळी कोशिंबीर खेळावी लागणार नाही.
गरज सुयोग्य नियोजनाची
भारताच्या महिला संघाची कामगिरी बलाढ्य ऑस्ट्रेलियासारखी व्हावी अशे वाटत असेल तर त्या दृष्टीने नियोजन करण्याची गरज आहे. महिलांच्या स्पर्धांमध्ये वाढ केली गेली पाहिजे. त्यांच्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील क्रिकेट सेंटर ऑफ एक्सलंसद्वारे प्रबोधन, सल्ला व मार्गदर्शन शिबिरे, अत्याधुनिक सुविधांद्वारे सरावाचे तंत्र, देशातील महिला व पुरुष क्रिकेट संघाकडून खेळलेले अनुभवी खेळाडूंचे प्रशिक्षण देणे अशा गोष्टी केल्या पाहिजेत. भारताचा पुरुष संघ ज्या प्रकारे वर्षातील तब्बल पाच ते सहा महिने सातत्याने सामने व स्पर्धा खेळतो त्याच धर्तीवर महिलांच्या संघालाही सामने खेळायला मिळाले पाहिजेत व ते देखील मायदेशासह परदेशात. तरच नवी गुणवत्ता पुढे येईल, त्यांना सातत्याने खेळवले गेले तरच त्यांचा आत्मविश्वासही वाढेल व संघाच्या कामगिरीतही एकप्रकारचे वर्चस्व निर्माण होईल. आता या परिस्थितीवर बीसीसीआय काय मार्ग काढते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अमित डोंगरे