अरुण गोखले
गेल्या बऱ्याच दिवसांपासून गुरुजींकडे काही तक्रारी येते होत्या. कधी कोणी तक्रार करायचं की, कोणीतरी माझी पट्टी चोरली. कोणी म्हणायचं, माझं पेन चोरलं. कोणी तक्रार करायचं की, माझं नवं पुस्तक चोरीला गेलंय. एक ना अनेक तक्रारी. बरं जोवर कोणी एखाद्याला तसं करताना प्रत्यक्ष पाहात नाही तोवर कोणावरही चोरीचा आरोप करणे हे गुरुजींनाही बरे वाटत नव्हते.
अचानक गुरुजींना एक कल्पना सुचली. दुसऱ्या दिवशी ते वर्गात आले आणि त्यांनी मुलांना सांगितले की मुलांनो, आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत. एक होता मुलगा तुमच्याच वयाचा. तो दिसायला चांगला होता. हुशार होता. त्याच्या घरी परिस्थितीसुद्धा बऱ्यापैकी होती. त्याचे वडील त्याला हवी ती वस्तू, खेळणं, पुस्तकं, कपडे आणून देत. पण त्या मुलाला एक वाईट सवय होती. किती केलं तरी त्याची ती सवय काही जात नव्हती. आपलं सांगून हा मुलगा ऐकत नाही,
असं म्हटल्यावर त्याचे वडील एके दिवशी त्याला एका साधूकडे घेऊन गेले. त्यांनी साधू-महाराजांना त्या मुलाबद्दल आधीच थोडी माहिती दिली होती. त्याची वाईट सवय दूर होण्यासाठी काहीतरी उपाय करा म्हणून महाराजांना विनंतीही केली होती. जेव्हा तो मुलगा साधूंच्या दर्शनाला पुढे आला तेव्हा त्यांनी त्याला मोठ्या प्रेमानी जवळ घेतले. थोडावेळ त्याला आपल्या जवळ बसवून घेतले. मग ते त्याला म्हणाले, “”बाळ, जा आणि बागेतलं एक छोटसं रोपटं काढून घेऊन ये”.
मुलगा आनंदाने गेला आणि काही वेळातच एक छोटसं रोपट घेऊन आला. साधू महाराज म्हणाले “”छान. बस जरासा”. थोड्या वेळाने त्यांनी त्या मुलाला एक मध्यम आकाराचे रोपटे उखडून आणायला सांगितले. थोड्या मेहनतीनंतर तो तेही घेऊन आला. ते मध्यम रोपटं उखडण्याच्या नादात त्याच्या हाता-पायाला, कपड्यांना माती लागली. हात, कपडे झटकून तो पुन्हा त्या साधू-महाराजांच्या जवळ बसला.
काही वेळ असाच गेला आणि साधू महाराज त्याला म्हणाले, जा आणि ते समोरचे झाड तोडून आण बरं. तो मुलगा गेला. त्याने ते झाड तोडून आणण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याला ते शक्य झाले नाही. तो रिकाम्या हातानीच परत आला.
आता तो मुलगा महाराजांना काही सांगणार त्याआधी तेच त्याला म्हणाले, “”बाळ त्याचं काय आहे. वाईट सवयी या अशा झाडासारख्या असतात. त्या जोवर लहान असतात तोवर त्या उपटता किंवा उखडून टाकता येतात. पण जर का त्या झाडासारख्या मोठ्या झाल्या, तर मात्र त्या सहजासहजी काढून टाकता येत नाहीत”. त्या खोलवर रुजलेल्या झाडासारख्या सवयींना शेवटी कुऱ्हाडीचे घाव घालून, शिक्षा करूनच मोडून काढाव्या लागतात.
तास संपल्याचा टोल पडला. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांना अपेक्षित असणारी ती प्रामाणिक कबुली मिळाली. “”सर, मला क्षमा करा. आज तुम्ही वर्गात सांगितलेल्या गोष्टीतून मला माझी चूक समजली आहे. मला एक संधी द्या, मी माझ्या मनातलं वाईट सवयीच रोपटं नक्कीच प्रयत्नपूर्वक उखडून काढीन”.