शर्मिला जगताप
“अर्धांगी’ची कथा ही साधनाची जशी कथा आहे तशीच ती विठ्ठलाचीही आहे. किंबहुना साधना-विठ्ठलची ही गोष्ट आहे. विठ्ठल दारूच्या आहारी गेलेला. तुरुंगातून सुटून आलेला. कुठल्यातरी मनोगंडाच्या भावनेने पछाडलेला; परंतु पुढे जाता प्रेमनिष्ठ बायकोला प्रेमासाठी श्रीकांतच्या हवाली करणारा असा. आणि साधना पतीच्या प्रेमासाठी झुरणारी- त्यात अपयश पदरी पडल्याने नवऱ्याला सोडून श्रीकांतच्या प्रेमात पडणारी- पण अखेरीस पतीच्या हातूनच मरण पत्करणारी. या कथेत साधनाच्या आयुष्याचा जीवनपट रेखाटताना नाटककार शैलीदार संवादाची जागोजागी पाखरण करतात, हेही विशेष आहे.
या नाटकाचे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट म्हणजे स्त्री-पुरुषाचं थेट प्रेक्षकांसमोर रंगमंचावर प्रणय दृश्य. साधारणतः पाच-सहा दशकांपूर्वी असा थेट प्रयोग म्हणजे धाडसच म्हणावे लागेल. त्यातही साधनाची भूमिका साकारणाऱ्या नटीचं आणखीनच धाडस वाटतं. कारण श्रीकांत-साधनाचे प्रणय प्रसंग ज्या संयमाने टिपले गेले आहेत ते तितकेच परिणामकारक वाटतात.
विठ्ठलचा स्वतःशीच चाळा करणारा प्रसंग… साधना अशी का वागली? मग तिला माफ करणार नाही- या संतापाने तिचा गळा दाबणारा विठ्ठल. हे नाट्य आजही जसेच्या तसे समाजाच्या रंगमंचावर सादर केले जाते. नवरा दारू पिणारा, मग बायकोकडे दुर्लक्ष, घरसंसार उद्ध्वस्त. अशावेळी आजच्या साधनाने काय करावे? असा मौलिक प्रश्न हे नाटक आजच्या पुरुष वर्गाला विचारते.
स्त्री सुलभ मनाला, भावनांना जखडून ठेवावे की वाट करून द्यावी. पती परमेश्वर मानणाऱ्या स्त्रीवर्गाला यातून हाच संदेश दिला गेला आहे की, ज्याच्यासोबत संसार करणे शक्य नाही त्याच्यासोबत जीवन कंठत बसण्यात काय हाशील होणार. आपले पंख आकाशात उंच झेप घेण्यासाठी आहेत. नवी क्षितीजे पार करण्यासाठी आहे. मुक्त विहंगासारखे आपण आपले आयुष्य सुखकारण करण्यात गैर काय आहे. नाहीतरी नवऱ्याच्या हातून बळी जाणाऱ्या साधनांची संख्या आजही काही कमी आहे काय?