बीड – संजय राऊत यांनी युतीबाबत केलेल्या विधानावर मी टिप्पणी करू शकणार नाही. पण त्यांच्या भावनेला पक्षातील पक्षाध्यक्ष आणि पक्षातील निर्णय घेणारे इतर नेतेच उत्तर देतील, असे सांगतानाच राजकारणात कधीही कोणतीही भविष्यवाणी बदलू शकते असे माझे मत आहे, असे सूचक विधान भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केले. त्या बीड येथील शेतकरी मेळाव्यात बोलत होत्या.
भविष्यात शिवसेना-भाजप एकत्र येणार नाही. एखाद्या भूमिकेवरून शिवसेना माघार घेणार नाही, असे राऊत म्हणाले होते. त्यावर पंकजा मुंडे यांनी हे विधान केले आहे. या मेळाव्यात त्यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही जोरदार टीका केली. बीडच्या मुद्द्यावरून माझी कशाला बदनामी करता? असा सवालच त्यांनी धनंजय मुंडे यांना केला.
राजकारणात वैयक्तिक वैर नसावे. हे नवीन पिढी शिकली नाही. एखाद्यावर चौकशी लावू शकतो, पण असा नेता राजकारणात दीर्घकाळ टिकत नाही, असे सांगत पंकजा मुंडे यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री, दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचं कौतुक केलं.
महाराष्ट्रातील विद्यार्थी हे यशवंतरावांचे देणे लागतात. आज राज्यात गुणांची खाण असणाऱ्या नेत्यांची संख्या कमी आहे. भविष्यात दुर्गुणांची खाण असलेले नेतेच महत्त्वाचे वाटतील. युद्ध जिंकणे आणि हारणे हे खरे राजकारण नाही. लोकांची मने जिंकली पाहिजेत. सध्या राजकारणात सर्कस सुरू पाहायला मिळतेय. राज्य करताना सात्विकपणे केले पाहिजे आणि युद्ध करताना पराक्रमाने केले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.