सातारा -जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये सात करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी बुधवारी दिली. गेल्या दीड महिन्यापासून बाधितांची संख्या सातत्याने कमी असल्याने जिल्हावासीयांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी मृत्यू रोखण्यात अजूनही यश का येत नाही, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांमध्ये करोनाने एकूण 11 बळी घेतले असून बुधवारपर्यंत करोनाबळींची एकूण संख्या 1653 झाली आहे.
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना रोहोट, ता. सातारा येथील 68 वर्षीय पुरुष, आर्वी, ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय महिला, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना झरे, ता. आटपाडी (जि. सांगली) येथील 69 वर्षीय पुरुष, अंबरवाडी, ता. खंडाळा येथील 65 वर्षीय पुरुष, बिदाल, ता. माण येथील 52 वर्षीय पुरुष, विठ्ठलवाडी, ता. वाई येथील 79 वर्षीय पुरुष, नांदगणे, ता. जावळी येथील 62 वर्षीय महिला, अशा एकूण सात करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.