कराड – कराड तालुक्यात मुंबईहून गावी आलेला 60 वर्षीय पुरुषास करोनाचे लक्षणे आढळून आल्याने त्याला येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. या व्यक्तीच्या करोना चाचणीचा अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. उंडाळे परिसरातील “त्या’ गावासह दीड किमी परिघातील सर्व गावे प्रशासनाने सील केली आहेत. या करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले तीन खासगी डॉक्टर, जिंती येथील 16 व म्हारुगडेवाडी येथील 18 ग्रामस्था, अशा एकूण 34 जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या सहा झाली आहे.
याबाबत माहिती अशी, मुंबईतील नेरूळमधील मच्छी मार्केटमध्ये काम व रिक्षा व्यवसाय करणारी 60 वर्षीय एक व्यक्ती लॉकडाऊनच्या काळात 27 मार्च रोजी रात्री स्वतःच्या रिक्षातून सोबत पाच नातेवाइकांना घेऊन कराडकडे यायला निघाली. हे सर्व जण कराड तालुक्यातील उंडाळे परिसरातील त्यांच्या गावात 28 मार्च रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास पोहोचले. संबंधित 60 वर्षीय व्यक्तीस दोन दिवसांनी ताप आला.
त्या व्यक्तीने उंडाळेतील दोन खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेतले. या उपचाराने त्रास कमी न झाल्याने संबंधिताने नांदगाव येथील एका खासगी दवाखान्यात उपचार घेतला. त्यानंतरही घशाचा त्रास व ताप वाढल्याने त्याला कृष्णा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. तेथे त्याच्या घशाच्या स्रावाचे नुमने घेऊन पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्याचा अहवाल आज (मंगळवार) मिळाला असून तो रुग्ण करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. कराड दक्षिणमधील दक्षिण मांड खोऱ्यात करोनाबाधित रुग्ण आढळल्याचे समजताच उंडाळे परिसरात खळबळ उडाली. तालुक्यात दुसरा करोनाबाधित रुग्ण आढळल्याने प्रशासन हादरले आहे.
प्रांताधिकारी उत्तम दिघे, उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील, डॉ. सुभाष पाटील, डॉ. शेखर कोगनुळकर, डॉ. जयवंत थोरात, स्थानिक आशा स्वयंसेविका, पोलीस पाटील संतोष पाटील यांनी तात्काळ यंत्रणा राबवून करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या जिंती येथील 16 व म्हारुगडेवाडी येथील 18 जणांना कृष्णा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले.
खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने उंडाळे-साळशिरंबे-जिंती येथील वाहतूक बंद केली आहे. “त्या’ गावातील बाधित रुग्णाच्या घरापासून इतरत्र जाणारे सर्व रस्ते, गल्लीबोळ बंद करण्यात आले आहेत. गावाला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले आहे. दरम्यान, करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले मुंबईकर धास्तावले आहेत. बाधिताच्या संपर्कात अजून किती जण आले होते, याची माहिती घेण्यासाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी वैद्यकीय पथक गावात तळ ठोकून आहे.
ग्रामस्थ व नातेवाइकांनी पुढाकार घ्यावा
कराड दक्षिणेतील बहुतांश नागरिक नोकरी, व्यवसायासाठी मुंबई, पुण्यात आहेत. मुंबईतून आलेल्यांपैकी एकाला करोनाची बाधा झाल्याने मुंबईतून आलेल्या इतरांनी वैद्यकीय तपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर करोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेले ग्रामस्थ व नातेवाइकांनी स्वत: पुढे येऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.