-सत्येंद्र राठी
करोनाच्या भयपर्वात जे काही बदल घडले त्यात उल्लेखनीय आहे की लोकं स्वतःच्या आहाराबद्दल अधिक जागरूक झाले. एका प्रतीने हे चांगलेच म्हणावे कारण मागील दोन-तीन दशकांत आपल्या जीवनातून आहाराच्या सकसपणाचे महत्त्व झपाट्याने कमी झाले आहे.
आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर जीवनाचा नवा अर्थ उलगडणाऱ्या वळणांना भारतीय परंपरेने “सोळा संस्कार’ असे नामाभिधान देत पुढे आणले. या सोळांमध्ये “अन्नप्राशन’ संस्कारास अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून तर भोजन या संकल्पनेस “उदरभरण नव्हे तर यज्ञकर्म’ असे मानले गेले आहे.
श्रीकृष्ण सांदिपनी ऋषींच्या आश्रमातून आपले विद्याभ्यास पूर्ण करून निघत होते. सांदिपनी ऋषींनी त्यांना विचारले, “माधवा, सांग तुला काय आशीर्वाद देऊ?’ यावर कृष्णाने “मातृ हस्तेन भोजनम्’ असा आशीर्वाद देण्याची विनंती केली. अर्थात, मला नेहमी आईच्या हाताचे भोजन प्राप्त व्हावे. ज्या अर्थी देवेश्वर कृष्णानेही असे वर मागितले यावरून जीवनात उचित पोषणमूल्याच्या आहाराचे किती महत्त्व आहे, हे सिद्ध होते. म्हणून भारतीय परंपरेत भोजन आणि भोजनशैलीला विशेष स्थान देण्यात आले आहे. आपल्या जडणघडणमध्ये आहाराची मोठी भूमिका असते. ते सुवाच्य, सकस, निरलस असणे अत्याधिक गरजेचे असते, कारण असे भोजन शरीरास पुष्ट बनवते; म्हणूनच घरचे भोजन महत्त्वाचे ठरते.
घरचे भोजन करणारी स्त्री; मग ती आई असो वा पत्नी, तिच्या हातच्या भोजनातून आपल्याला प्रचंड ऊर्जा प्राप्त होत असते. तिने बनविलेल्या भोजनात घरच्यांसाठी तिची शुभकामना, तिचे आशीर्वाद सामावलेले असतात. तिच्या भोजनात कुटुंबाचे कुशल क्षेमचा विचार असतो. जेवण बनविण्यासाठी लागणाऱ्या पदार्थांखेरीज ती तिचा आनंद, तिचा जिव्हाळा, सौम्यपणा, स्नेह, ममता, मार्दव, वात्सल्य इत्यादीही जेवणात मिसळत असते. संस्कारात गुणांतराधनम।। अर्थात तिच्या संस्काराने भोजनाचे गुणधर्म बदलून जातात. शरीरासाठी उपयुक्त तरी नापसंत असलेले घटक, आवडत्या पदार्थात बेमालूमपणे मिसळून देत अन्नाद्वारे ती औषधींचा पुरवठाही करत असते. थोडक्यात काय तर ती आपले अस्तित्वच भोजनात समर्पित करते. भोजन बनविणारा प्रसन्नचित्त आणि ग्रहण करणारा शांतचित्त असावा, असे पूर्वापारपासून अभिप्रेत आहे. पूर्वीच्या काळी स्वयंपाकघरात घरच्या सदस्यांचा अनावश्यक प्रवेशही निषिद्ध असे. जंतू संसर्गापासून अन्नाचा बचाव व्हावा यासाठीची ही शुचिता. आपल्याकडे भोजन वाढण्याचे सूत्रही सांगण्यात आले आहे. चटणी, कोशंबिरीसारखे कमी खाल्ले जाणारे डावीकडे तर भात, पोळी, भाजी ताटाच्या उजवीकडे वाढण्याचा संकेत आहे.
बोट, ओठ आणि जिव्हा याचे तापमान एक असल्यामुळे हाताने खाल्ल्याने अधिक लाळ स्त्रवते, भोजनशास्त्रावर याहून वेगळे काय अभ्यास अपेक्षित असावे. पाटावर पालथी मारून बसल्याने जेवताना किंचित पुढे वाकावे लागते; याने दोन घास कमी खालले जातात, जे स्वास्थ्यास हितकारक असते. भोजनाआधी प्रार्थना म्हणावी या मागचे विज्ञान हेच की, त्या अवधीत आपले चित्त हळूहळू शांत व स्थिर व्हावे जेणेकरून अन्न नीट अंगी लागेल. जुन्या लोकांना माहीत असेलच की, आजहून पन्नासएक वर्षांआधी साधारणतः बाहेर खायचे झाले की लपूनछपून खाल्ले जाई. बाहेर खाणे सामाजिक दृष्टीने कमीपणाचे समजले जाई. याला घरी खायला मिळत नाही का? अशी पृच्छा केली जात असे. परान्न अर्थात परक्याचे अन्न, असे कोणतेही अन्न वर्ज्य मानले जात. आपल्या बोलण्या-वागण्यावर, विचारांवर, वृत्ती, व्यवहारावर अन्नाचा मोठा प्रभाव असतो. म्हणूनच भोजनाचा नैवेद्य देवास दाखवून त्यास प्रसाद म्हणून ग्रहण केले जात.
पंक्तीतही भोजनाच्या सभ्यता पाळल्या जात. शेवटच्या व्यक्तीस सारे पदार्थ पोहोचल्याखेरीज पहिला माणूस खाणे सुरू करीत नसे, तसेच जेवून झालं म्हणून कोणीही पंक्तीतून मध्येच उठतही नसत. आपण असे उठलो तर शेजारच्याला पुढे जेवताना संकोच होईल यासाठीचे हे भान. एकूणच अन्नाचे इतके महिमामंडन करण्याचे कारण हेच, की मागील काही काळापासून आपल्या जगण्यात भोजनाची उपयोगिता केवळ पोट भरण्यापुरतीच होऊ लागली आहे. दर्ज्यापेक्षा चवीचे आकर्षण वाढू लागले आहे. चाकरमानीची गरज असो किंवा नव्याने आलेली सुबत्ता असो, जीवनाच्या चलनवलनला नियमित करणाऱ्या भोजनाच्या दर्जात आपण कमालीची तडजोड करू लागलोय. भोजन हे शरीराचे इंधन आहे, हे जितके दर्जेदार असेल ते शरीरास तितकेच निरामय ठेवते.
खरं तर आजच्या जीवनशैलीत होणारी धावपळ, यातायात, मेहनत, ताणतणाव इत्यादींमुळे शरीराची गरजेपेक्षा जास्त झीज होत आहे. अशा वेळी आहार कसदार असणे अनिवार्यच आहे. त्यामुळे शरीर जपणाऱ्या व त्यास स्वस्थ ठेवणाऱ्या भोजनाला प्राधान्य द्यायला हवे. शरीर स्वस्थ असेल तरच आपल्याला जगण्याचा आनंद घेता येऊ शकतो. ज्या शरीराकडून आयुष्यभर काम करून घ्यायचं आहे, निकृष्ट अन्नसेवन करून त्याची अबाळ करून कसे चालेल? आपले उपनिषदातही हेच सांगितलं गेले आहे. “शरीर माद्यं खलु धर्म साधनम्’ अर्थात शरीर हे सगळ्या धर्म (कर्मांचं) साधन आहे. त्यामुळे आहाराची काळजी घ्या, आहार तुमची काळजी घेईल. करोनामुळे जडलेली घरचे खाण्याची सवय करोनानंतरही जपणे हे सगळ्यांसाठी हितकारक ठरेल.