माधव विद्वांस
मराठीतील पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार. संगीतकार, गीतकार, अण्णासाहेब किर्लोस्कर यांची आज जयंती. त्यांचा जन्म 31 मार्च 1843 रोजी धारवाड जिल्ह्यात गुर्लहोसूर या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बळवंत पांडुरंग किर्लोस्कर. कानडी प्रदेशात राहत असल्याने त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षांपर्यंत कानडी व मराठी भाषेचा अभ्यास घरीच केला. नंतर धारवाड व कोल्हापूर येथे शालांत परीक्षेपर्यंत शिकले. तेथेच मुलकी परीक्षेपर्यंत शिकले. त्यापुढील शिक्षणासाठी पुण्यास आले. येथे त्यांना नाटकांचा नाद लागला व ते नाटक मंडळांना पदे रचून देऊ लागले.
स्वतःची नाटक मंडळी काढून त्यांनी काही नाटकेही केली. फारसे यश न आल्याने ही नाटक मंडळी मोडली आणि ते परत गुर्लहोसूर येथे येऊन राहिले. त्यानंतर त्यांनी वकिलीची परीक्षा देण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी न झाल्यामुळे ते नोकरी करू लागले. शिक्षक, जमादार आणि महसूल आयुक्ताच्या कचेरीतील कर्मचारी अशा अनेक प्रकारच्या नोकऱ्या त्यांनी केल्या, पण नाटकाची ओढ होतीच. नोकरी करीत असताना अण्णासाहेबांनी प्रारंभी अल्लाउद्दिनाची चितुडगडावरील स्वारी हे नाटक लिहावयास घेतले होते. ते पूर्ण झाले नाही. वर्ष 1873 मध्ये शिक्षकाची नोकरी करीत असताना “शांकरदिग्जय’ हे गद्य नाटक त्यांनी लिहिले. पुणे येथे वर्षे 1880 मध्ये त्यांनी एका पारशी नाटक मंडळीचे नाटक पाहिले. तशा पद्धतीचे नाटक मराठीत करण्याची त्यांना इच्छा झाली व त्यांनी कालिदासाच्या “अभिज्ञानशाकुंतल’ या नाटकाचे मराठी भाषांतर केले. त्यामध्ये स्वतःची पदेही घातली आणि उत्तम नटसंच तयार करून ते रंगभूमीवर आणले. या नाटकास अभूतपूर्व यश आणि लोकप्रियता मिळाली. तेव्हा त्यांनी “किर्लोस्कर नाटक मंडळी’ची स्थापना केली. त्यानंतर वर्ष 1882 मध्ये सुभद्राहरणावरील “संगीत सौभद्र’ हे नाटक त्यांनी लिहिले व मंचावर आणले. या नाटकाचा 18 नोव्हेंबर 1882 रोजी पुण्यातील पूर्णानंद नाट्यगृहात त्याचा पहिला प्रयोग झाला. या पौराणिक नाटकात बालगंधर्व, भाऊराव कोल्हटकर, बाळकोबा नाटेकर, शंकरराव मुजुमदार, मोरोबा वाघोलीकर आणि स्वत: अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी भूमिका केल्या होत्या. या नाटकातील गीते अतिशय गाजली व त्यामुळेच नाटकही खूप प्रसिद्ध झाले व संगीत नाटकांचे पर्व सुरू झाले. या नाटकातील “अरसिक किती हा शेला’, “नच सुंदरि करूं कोपा’, “नभ मेघांनीं आक्रमिलें’, “प्रिये पहा रात्रीचा समय’, “वद जाऊ कुणाला शरण’, “पावना वामना या मना’, “राधाधरमधुमिलिंद’ अशी एकाहून एक सुंदर सुश्राव्य सुरेल पदांमुळे या नाटकाने लोकप्रियतेचे शिखर गाठले. नच सुंदरि करूं कोपा, हे सौभद्र नाटकातील अण्णासाहेबांनी रचलेले व संगीतबद्ध केलेले पिलू रागातील हे गाणे कुमार गंधर्व, खॉंसाहेब अब्दुल करीमखॉं तसेच आजीकडकडे यांनी गायले. बालगंधर्वांनीही या नाटकातील सुभद्रेची स्त्री भूमिका केली होती. रामराज्यवियोग ह्या त्यांच्या अखेरच्या नाटकाचे तीन अंक लिहिल्यानंतर ते मधुमेहाच्या विकाराने 2 नोव्हेंबर 1885 रोजी गुर्लहोसूर येथे निवर्तले.