केळघर – गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यातील करोनाबाधितांनी अडीच हजारांचा आकडा गाठला. विशेष म्हणजे जावळी तालुक्यातील अवघ्या सहाशेच्या आसपास लोकसंख्या असणाऱ्या एकट्या पुनवडी गावातच 150 जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र जाहिर केले आहे. मात्र याचा फटका येथील भात शेतीला बसला आहे. सध्या भात लागवडीचे दिवस असतानाही करोनामुळे लोकांना घरातून बाहेर पडता येत नसल्याने शेती पडून राहण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे.
पुनवडी (ता. जावली) येथील बधितांच्या संख्येने 150 चा आकडा पार केला असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात मोठ्या संख्येने बाधित आढळून आल्याने प्रशासनाने गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्याने गावातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. याचा सर्वाधिक फटका पुनवडी येथील शेतकऱ्यांना बसला आहे. घराबाहेर पडता येत नसल्याने पुनवडी येथील भात लावणी पूर्णपणे थांबलेली आहे. एकीकडे पावसाची उघडझाप सुरू असल्याने भात लागणीस विलंब होत आहे. त्यामुळे पुनवडी येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
येथील शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. तसेच नियम शिथिल करून भात लागणीस परवानगी मिळावी, अशी मागणी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व शिवसेनेचे संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे यांनी केली आहे. गाव प्रतिबंधित क्षेत्र असल्याने येथील भातशेतीची लावणी वेळेत न झाल्यास शेतकऱ्यांचे वर्षभराचे नियोजन कोलमडणार आहे.
त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी एकनाथ ओंबळे यांनी केली आहे. पुनवडी येथील शेतकऱ्यांचा प्रश्न राज्य शासनाकडे मांडून येथील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ओंबळे यांनी स्पष्ट केले आहे.