कवठे -एखादी गोष्ट साकारायची जिद्द दाखवली तर ती साध्य करताच येते. याचे उदाहरण म्हणजे कळंबे, ता. वाई येथील प्रगतिशील शेतकरी रमेश आनंदराव वाघमारे यांची शेती. कोकणातील शेती म्हणजे तांदळाचे आगार. कोकणातील दहा प्रकारच्या भाताचे वाण कोकणातच वटते, म्हणजे जास्त प्रमाणात उत्पादन होते.
महाराष्ट्रासह देशात कोकणच्या तांदळाला भलतीच मागणी आहे. रमेश वाघमारे यांनी कोकणातील मेनका, इंद्रायणी, काळी कुसळ या भाताच्या वाणांची लागवड केली आहे. ज्या प्रकारे कोकणात डोंगराच्या कुशीत निचरा होऊन झिरपणाऱ्या पाण्यावर भातशेती केली जाते, त्याच प्रकारे वाघमारे यांनी एक एकर क्षेत्रात भात लागवड केली आहे.
अशा प्रकारची शेती कोकणात आपल्याला दिसत होती; परंतु आता महामार्गावरील पट्ट्यात ग्रामीण भागसुद्धा मागे राहिला नाही. वाघमारे यांनी जमिनीची त्या प्रकारे ठेवण बनवल्याने तांदळाचे प्रचंड उत्पादन मिळत आहे. वाघमारे हे गेल्या पाच-सहा वर्षांपासून मेनका, इंद्रायणी, काळी कुसळ या वाणांची लागण करून भात शेती करत आहेत.
त्याचबरोबर इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. ते प्राथमिक शिक्षक असून त्यांनी गीर गायीसुद्धा पाळल्या होत्या. योग्य नियोजन केल्यास कोकणात पिकणारा उच्च प्रतीचा तांदूळ वाई तालुक्याच्या पूर्व भागातसुद्धा पिकवला जाऊ शकतो, हे वाघमारे यांनी सिद्ध केले आहे.