मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनाला ईडीने पुन्हा विरोध केला आहे. अनिल देशमुख हेच या कटामागेच ‘मास्टर माईंड’ आहेत, असे ईडीने उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्यापुढे देशमुखांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांवर प्रभाव टाकला, असा आरोपही ईडीने केला आहे. पदाचा दुरुपयोग करून देशमुख यांनी मोठ्या प्रमाणात पैशांचा अपहार केल्याचा दावा ईडीने केला आहे.
ईडीच्यावतीने सहाय्यक संचालक तसिन सुलतान यांच्यावतीने ईडीचे वकील श्रीराम शिरसाट यांनी उत्तरादाखल काल 56 पानी प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले. देशमुख हेच या मनी लॉन्ड्रिंगच्या कटामागेच मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी बेहिशेबी मालमत्ता जमवण्यासाठी अधिकृतपणे आपल्या पदाचा गैरवापर केलेला आहे. पोलीस दलातील अधिकार्यांच्या बदल्या आणि पोस्टिंग तसेच पोलीस अधिकार्यांच्या कामगिरीवर अवाजवीपणे त्यांनी प्रभाव टाकल्याचंही यात नमूद केलेले आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सध्या प्राथमिक टप्प्यात आहे.
अनिल देशमुख हे एक राजकारणातील प्रभावशाली व्यक्ती असल्याने त्यांची सुटका झाल्यास ते साक्षीपुराव्यांशी छेडछाड करू शकतात. तसेच देशमुख हे तपासात सहकार्य करत नसल्याने त्यांना जामीन देऊ नये, असेही ईडीने म्हटलेले आहे. याशिवाय देशमुखांपेक्षाही वयाने मोठे असलेले अनेक आरोपी जेलमध्ये आहेत, त्यामुळे वाढत्या वयाचा दाखला देऊन जामीन मागणे चुकीचे असल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे.
भ्रष्टाचारातून मिळवलेल्या बेहिशेबी पैशातून देशमुखांनी कुटुंबातील सदस्यांच्या नावे विविध मालमत्ता तयार केल्या आहेत. त्यांच्याच सूचनेवरून त्यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे हे पोलीस अधिकाऱ्यांची नावे असलेल्या अधिकृत याद्या पोस्टिंगसाठी अनुकूल आणून देत असत. मुंबई शहरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भातील याद्याही तत्कालीन गृहमंत्र्यांच्या कार्यालयात कॅबिनेट मंत्र्याशी सल्लामसलत करूनच तयार करण्यात आल्या होत्या. त्या याद्या पालांडे आणि रवी व्हटकर यांच्यामार्फत पोलीस आयुक्तांकडे सोपवण्यात आल्याचेही यात म्हटलेले आहे.