गुवाहाटी – आसाम सरकारने एनआरसी म्हणजेच नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्सची अंतिम यादीत तब्बल 19 लाख रहिवासी घुसखोर ठरवले आहेत. त्यांची नावे या यादीत समाविष्ठ न करण्यात आल्याने त्यांना आता पुन्हा आपले नागरिकत्व सिद्ध करावे लागणार आहे. या यादीत एका गावातील तब्बल २०० जणांची नावे वगळण्यात आली असून तेथील ग्रामस्थ भाजप सरकारवर चांगलेच नाराज झाले आहे. या २०० लोकांनी नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा इशारा भाजप सरकारला दिला आहे.
विश्वनाथ जिल्ह्यातील गोहपूरस्थित सकुरा गावातील २०० लोकांची नावे वगळण्यात आली आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, १९६४ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ग्रामस्थांना याठिकाणी घर दिले होते. याची सर्व कागदपत्रे ग्रामस्थांनी एनआरसी कार्यालयात दिली होती. तरीही स्थानिक २०० ग्रामस्थांची नावे एनआरसी सूचीत नाही. याप्रकरणी ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच न्याय मिळाला नाहीतर दुबिया नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा इशारा एनआरसी अॅथोरिटीजला देण्यात आला आहे.
दरम्यान, आसामातील नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स म्हणजेच एनआरसी अंतिम यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली. या यादीत ३ कोटी ११ लाख २१ हजार नागरिकांना स्थान मिळाले. तर १९ लाख ६ हजार ६५७ जणांना या यादीमधून वगळण्यात आले होते.