ग्रामस्थांनी गावातील कचराच टाकला सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रासमोर
कुरकुंभ- येथील औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांपासून होणारे प्रदूषणाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. “एमआयडीसी’मधील काही कंपन्यांच्या प्रदूषणाला अक्षरशः ग्रामस्थ कंटाळून गेले आहेत. मात्र, प्रदूषण थांबण्याचे कुठे चित्र दिसत नाही. प्रदूषणाला कंटाळून मंगळवार (दि. 15) स्थानिक ग्रामस्थांनी सामाईक कचराच सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या प्रवेशद्वारासमोर टाकला. येथील ग्रामस्थ कंपन्यामधील रोजच्या प्रदूषणाचा सामना करत आहेत.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत औषधे, सुंगधी द्रव्य, गॅस, तसेच विविध रसायने बनवत असल्याने या परिसरात वायू प्रदूषणाचा उग्र वास येतो. याबरोबरच येथील सर्व कंपन्याचे दूषित सांडपाणी या सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात आणून त्यावर प्रक्रिया करून ते पाणी शुद्ध केले जाते. मात्र, कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्राजवळ एक नाला आहे. त्यात मोठे गोल आकाराचे सिमेंट पाइप आहे. गेल्या काही दिवसांपासून नाल्यातून सांडपाणी वाहण्याचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, सध्या पुन्हा या नाल्यातून कंपन्यांचे सांडपाणी शुद्धीकरण न होता तसेच दूषित वाहताना दिसत आहे.
सांडपाणी पुढे नाल्यातील सिमेंट पाइपातून महामार्गाच्या पलीकडे शेतात जमा होते, त्यामुळे येथील स्रोत दूषित होऊन येथील शेतजमिनी नापीक बनल्या आहेत. या संदर्भात वारंवार जिल्हा अधिकारी, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी करूनही प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याचे दिसून येत आहे. याला कंटाळूनच शेवटी येथील ग्रामस्थांनी गावातील कचराच सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या प्रवेशद्वारासमोर टाकला. आता तरी येथील अधिकाऱ्यांना जाग येईल का, असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे.
- येथील कंपन्यांतील प्रदूषणाचा प्रश्न सध्या खूप भेडसावत आहे. कंपन्या अगदी गावालगत असल्याने या प्रदूषणाचा त्रास ग्रामस्थांना होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वेळोवेळी तक्रारी करून देखील ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत,गावातील कचऱ्याचा दुर्गंधीचा सामना येथील अधिकाऱ्यांना करावा लागल्याने अधिकाऱ्यांची झोप उडून येथील ग्रामस्थांना या प्रदूषणाचा किती त्रास होतो, हे समजल्याशिवाय राहणार नाही. कंपन्यातील प्रदूषणाचे पाणी पूर्णपणे बंद होईपर्यंत गावातील असाच कचरा एमआयडीसीमध्ये टाकला जाईल.
– राहुल भोसले, सरपंच, कुरकुंभ