जाधववाडी – पीएमपी प्रवाशांची सोय होण्यासाठी मागील अकरा महिन्यांपासून मोशी ते मनपा भवन बससेवा सुरू होती. परंतु पीएमपीएमएलने अचानक बस बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोशीतील ग्रामस्थांसह प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. ही बससेवा पुन्हा सुरू न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे.
मोशी ते मनपा भवन बसमार्ग सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक व महिलावर्ग यांची थेट बस उपलब्ध झाल्यामुळे चांगली सोय झाली आहे. मात्र, पीएमपीएमएल प्रशासन अल्प उत्पन्न म्हणून हा मार्ग बंद करत आहे.
वास्तविकता वेगळीच आहे. या मार्गावर वेळापत्रकानुसार बस उपलब्ध करून देऊन बसची वारंवारिता वाढविणे आवश्यक आहे. तसेच येथील बस थांबा स्थलांतरित करून चालक व वाहक यांना बस उभी करण्यात येत असलेला अडथळा दूर करावा, अशी मागणी स्थानिकांनी अनेकदा प्रशासनाकडे केली. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
बसथांब्यावरील अतिक्रमण, बस इतर ठिकाणी उभी राहणे, वारंवारिता कमी असणे यामुळेच प्रवासी संभ्रमात पडत आहेत. या समस्या दूर करून योग्य सेवा देण्यावर भर देणे गरजेचे असताना मोशी सारख्या उपनगरांत अल्प उत्पन्न मिळते हे आश्चर्यकारक वाटते. या उपनगरांत लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
बसने प्रवास करणारांची संख्यादेखील वाढत आहे. येथील नागरिक मनपाचा कर भरत आहे. त्या करातूनच मनपा पीएमपीएमएलला संचलनासाठी तूट भरून काढण्यासाठी निधी उपलब्ध करून देते. मग बससेवा उपलब्ध करण्यात दुजाभाव का केला जातो? असा प्रश्न निर्माण होतो. या मार्गावर वारंवारिता वाढवून प्रवाशांना अधिक सेवा देणे आवश्यक आहे. मात्र एक ते दीड तासाने या मार्गावर बससेवा दिली जाते. इतका वेळ प्रवासी वाट न पाहता इतर पर्याय शोधून प्रवास करतात. त्यामुळे पीएमपीएमएल प्रशासनाने मोशी ते मनपा भवन मार्ग पुन्हा ताबडतोब सुरू करून, बसची संख्या वाढवावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांसह प्रवाशांनी केली आहे.