औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मागणीनंतर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने आपला उमेदवार मागे घेतला आहे. एखाद्या ठिकाणी आमदाराचे अकाली निधन झाल्यास आणि पोटनिवडणुकीत त्याठिकाणी त्याच्या कुटुंबातील व्यक्ती उभा असल्यास विरोधी पक्ष उमेदवार उभा करत नाही. ही महाराष्ट्रची राजकीय संस्कृती आहे असे म्हणत भाजपला उमेदवार मागे घेण्यास मागणी करण्यात आली होती.
दरम्यान निवडणूकित माघार घेतल्याने भाजपवर टीका होत आहे. पराभव समोर दिसत असल्याने भाजपने माघार घेतली असल्याची टीका विरोधी पक्ष करत आहेत. दरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही भाजपवर टीका केलीय.
आपला उमेदवार पराभूत होणार हे समजल्याने त्यांची फाटली असेल म्हणून त्यांनी माघार घेतली अशी जहरी टीका केली आहे.
जलील म्हणाले की, अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीतून ज्याप्रमाणे भाजपने माघार घेतली आहे, त्याचा एकच अर्थ होतो ते म्हणजे भाजपची फाटली आहे. त्यांना माहित झालं असावे की, एकदा मराठी शक्ती आपल्या विरोधात उभी राहिली तर आपले काय होऊ शकते. याचा अंदाज आल्याने त्यांनी माघार घेतली असावी, असे जलील म्हणाले.
पुढे बोलताना जलील म्हणाले की, त्यांच्या या निर्णयाशी मला काहीही देणघेण नाही. मात्र एक मराठी माणूस म्हणून मला आनंद आहे. कारण या देशात गुजराती लोकांनी जे आपलं वर्चस्व वाढवलं आहे. मुंबईत सुद्धा मराठी माणसाच्या डोक्यावर बसून या लोकांनी आपला वर्चस्व वाढवला आहे. त्यामुळे त्यांचा एक आमदार येणार होता मात्र आता तो येणार नसल्याचा मला आनंद वाटत असल्याचे जलील म्हणाले.
दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विरुद्ध भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. 2019 मध्येही ते शिवसेनेचे उमेदवार कै. रमेश लटके यांच्या विरुद्ध अपक्ष म्हणून लढले होते. यावेळी त्यांचा पराभव झाला होता.