ठाणे – ठाण्यातील अंबरनाथ येथे लोकल रेल्वे रुळावरून घसरल्याने दुर्घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. परंतु अपघातानंतर लोकलच्या पहिल्या आणि दुसऱ्या डब्याचे मोठे नुकसान झाले. परिणामी कल्याण-कर्जतकडे जाणारी लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाल्याची माहिती आहे.
लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळे मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मिळालेल्या माहितीतुसार, अपघातग्रस्त लोकलच्या दुरुस्तीचे काम रेल्वेकडून तात्काळ हाती घेण्यात आले.
रविवारी, सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. धावत्या लोकलच्या एका डब्याचे एक चाक साइडिंगमध्ये रुळावरून घसरले. मोटरमनने तातडीने लोकल थांबवल्याने मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि रेल्वेचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. अंबरनाथमधील रेल्वे अपघातामुळे एलटीटी-विशाखापट्टणम एक्स्प्रेसला अंबरनाथ स्टेशनवरच थांबवण्यात आले होते. तसेच डाऊन बदलापूर आणि अंबरनाथ लोकलला उल्हासनगर स्टेशनवर थांबवण्यात आले होते.