काठमांडू – भूतान शरणार्थी गैरव्यवहारप्रकरणी चौकशीसाठी नेपाळच्या माजी उपपंतप्रधानांसह एकूण 16 जणांची शुक्रवारी कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे. ज्यांची कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे, अशा व्यक्तींनी भूतानी शरणार्थी म्हणून परदेशात पाठवण्यासाठी नेपाळी व्यक्तींकडून मोठ्या रकमांची लाच स्वीकारली होती.
यामध्ये माजी उपपंतप्रधान टोप बहादूर रायमांझी, माजी गृहमंत्री बालकृष्ण खंड यांच्यासह काही निलंबित सचिव, मंत्र्यांचे स्वीय सहायक, सुरक्षा सल्लागार आणि शरणार्थ्यांच्या नेत्यांचाही समावेश आहे. त्यांच्यावर बनावटगिरी, गैरव्यवहार आणि संघटित गुन्हेगारीचे आरोप ठेवण्यात आले आहेत.
दोन आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. या गैरव्यवहाराबाबत पोलिसांच्या अहवालानंतर जिल्हा ऍटर्नी कार्यालयाने एकूण 188 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आणखीन 12 नेपाळी आरोपी फरारी आहेत.