मंगळुरू – यावर्षी करोनाची साथ पसरण्यापुर्वी भारतात आलेले अनिवासी भारतीय विमान सेवा पुन्हा सुरू होण्याची वाट पहात आहेत. त्यांना आपल्या देशात परत जाऊन पुन्हा नोकरीवर रुजू व्हायचे आहे. दीर्घकाळ घेतलेल्या सुटीचा त्यांच्या सेवा कारकिर्दीवर परिणाम होण्याची किंवा नोकरीतील त्यांचे स्थान गमावण्याची त्यांना भीती वाटत आहे.
कुवेतमध्ये नोकरी करणारे जीवन डीसोझा आपली पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी यावर्षी मार्च महिन्यात आले. ते आल्यानंतर आठवडाभरातच कुवेत आणि अन्य राष्ट्रातील विमानसेवा बंद करण्यात आली. कारण तोपर्यंत कर्नाटकसह भारतात दुसरी लाट विस्तारली होती.
विमानसेवा बंद केली, तेंव्हापासून माल कुवेतला दुबईमार्गे जायचे आहे. विमानसेवा ऑगस्टमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. माझ्या अनुपस्थितीमुळे माझ्या जागेवर कंपनीने दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती या आधीच केली आहे.
जर मला आणखी विलंब झाला तर माझी नोकरी जाण्याची शक्यता आहे, असे जीवन यांनी सांगितले. वाहतूक व्यवसायातील एका कंपनीत जीवन गेली 13 वर्ष कुवेतमध्ये कार्यरत आहेत.
जीवन यांच्यासारखे शेकडो अनिवासी भारतीय अडकले आहेत.
अनेक देशांनी करोना लसीकरण केलेल्यांनाच केवळ प्रवेश देण्यास सुरवात केली आहे. कॅनडामध्ये कार्यरत असणारे लावण्या आणि आकाश हे दाम्पत्य दोन महिने अडकून पडले आहे. ते परत जाण्याआधी एकच दिवस कॅनडाने आपल्या फ्लाईट बंद केल्या होत्या.
आमचे नियोजित विमान 23 एप्रिलला होते. पण, कॅनडाने 22 एप्रिलपासून सर्व माल आणि प्रवासी वाहतूक विमानसेवा बंद केली. आम्ही ही विमानसेवा सुरू होण्याची वाट पहात आहोत, असे त्यांनी सांगितले.
सध्या ते वर्किंग फ्रॉम होम करत आहेत. पण कामाची वेळ वेगळी असल्याने त्यांना रात्री जागावे लागते. कुवेतमध्ये नोकरी करणारे नेल्सन संदेश म्हणाले, मी कमी कालावधी साठी फेब्रुवारी 2020 मध्ये आलो.
महिन्याभराने कुवेतला जाणारी विमानसेवा बंद पडली. ज्यावेळी ती सुरू झाली, त्यावेळी मी आजारी पडलो. आता मी बरा झालो, पण पुन्हा विमान सेवा बंद पडली आहे. त्यांचे तेल्लूर आणि उडपी येथे नातेवाईक राहतात.
दीर्घकाळ वास्तव्य केल्यामुळे अनेकांना त्यांची नोकरी परत मिळेल, याची शाश्वती नाही. “मी कॅनडाचा कायमचा रहिवासी आहे. माझ्या गावी मी थोड्या दिवसांसाठी आलो होतो. मात्र, मी वेळेत परत न गेल्याने मला माझा जॉब गमवावा लागला, असे एक तरूणाने सांगितले.