मुंबई: भारतीय जनता पक्षाशी असलेली युती तोडून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. मात्र आता पुन्हा भाजपशी जुळवून घ्या अशी साद शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घातली आहे. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही विनंती केली आहे.
सत्तेत असलेले राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपले कार्यकर्ते फोडत आहेत. यामुळे पक्ष कमकुवत होत आहे, अशा आशयाचं पत्र प्रताप सरनाईक यांनी लिहिले आहे. शिवाय या पत्रात पंतप्रधान मोदींशी जुळवून घेतलेलंच बरं असंही सरनाईक यांनी म्हटले आहे.
ईडीच्या छापेमारीमुळे अडचणीत आलेल्या शिवसेना आमदार सरनाईक यांच्यावर भाजपच्या अनेक नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती. कंगना राणौत प्रकरणातही त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र आता सरनाईक यांनी भाजपसोबत जुळवून घेण्याचा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला आहे. ‘पुढील वर्षी मुंबई, ठाणे आणि अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतल्यास बरं होईल,’ असं सरनाईक यांनी पत्रात नमूद केलं आहे.
‘भाजपशी जुळवून घेतल्यास त्याचा फायदा आमच्या सारख्या काही कार्यकर्त्यांना आणि शिवसेनेला भविष्यात होईल असं मला वाटतं. आपण योग्य तो निर्णय घ्यालच. माझ्या मनात असलेल्या भावना पत्राद्वारे कळवल्या आहेत. लहान तोंडी मोठा घास घेतला आहे. काही चुकले असल्यास दिलगिरी,’ असे सरनाईक यांनी पत्राच्या शेवटी म्हटले आहे.
सरनाईक यांनी त्यांच्या पत्रात महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोपदेखील केले आहेत. ‘तुम्ही मुख्यमंत्रीपदाला प्रामाणिकपणे न्याय देत असताना दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, असं काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकांना वाटतं. त्यात काँग्रेस पक्ष एकला चलो रेची भूमिका घेत आहे.
तर राष्ट्रवादी दुसऱ्या पक्षाचे नेते-कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचे नेते-कार्यकर्ते फोडत असल्याचं चित्र दिसत आहे. महाविकास आघाडीतील काही मंत्री आणि काही सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा पाठीमागे लागू नये म्हणून केंद्रातील पक्षासह आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करत आहेत,’ असा खळबळजनक दावा त्यांनी पत्रात केला आहे.